Monday 25 August 2008

म्हशी

एका ठिकाणी यज्ञविधी चालू असतो. पुरोहित पूजा सांगत असतात. त्याचवेळी तिथे अचानक दुसरा एक ब्राह्मण उपस्थित होतो. पूजा सांगता सांगताच पुरोहित त्या ब्राह्मणाला म्हणतो,
अस्य मूर्खस्य यागस्य दक्षिणा महिषीशतम् ।त्वया अर्धं च मया अर्धं विघ्नं मा कुरु पण्डित ।।
ह्या मूर्खाच्या यज्ञात १०० म्हशी दक्षिणा म्हणून आहेत, तू अर्ध्या घे, मी अर्ध्या घेतो, (पण म्हशी दान केल्याने पुण्य नसते असे सांगून) हे पण्डिता ह्या यज्ञात विघ्न आणू नकोस.

सत्संग

दादरला चित्रा सिनेमाच्या समोरच्या गल्लीत शिरले की एक पोलीस चौकी लागते. तिलाखेटूनच एक सायकल दुरुस्तीचे बिननावाचे एक छोटे दुकान आहे. हे दुकान श्री. भूमकरयांचे आहे ज्यांना लोक भाऊ म्हणून ओळखतात. ह्यांचे शिक्षण बेतास बात आहे मात्रवाचन सर्वांगीण आहे.
दुकानात प्रवेश केला की समोरच हाताने लिहिलेले विविध फलक दिसतात ज्यावर अनेकसंतवचने, सुवचने, मनोगते दिसतात त्या पैकी मला भावलेले काही विचार पुढे देत आहे -
१) माणसाला तीन गोष्टी आल्याच पाहिजेत -पोहणे, सायकल चालवणे, झाडावर चढणे.
२) कृपया आम्हाला अंकल म्हणू नका. अंकल बेवड्याला आणि आंटी गुत्ता चालवणार्‍या बाईला म्हणतात.
३) अरे, मोबाईलवर २-२ तास बोलतोस आणि घरी भाजी मात्र २०० ग्रॅम आणतोस. छी! छी!
४) आपल्या मुलांची नावे टिनू, पिंकी, बंटी, रिटा अशी ठेऊ नका. मुले म्हातारी झाल्यावरकाय पिंकीआज्जी म्हणणार का?
५) मुलांना मम्मी पप्पा म्हणायला शिकवू नका. उद्या हिच मुले तुम्हाला पेकाटात लाथ घालून घराबाहेर घालवतील.
६) जीवनात लढाई करा. जिंकलात तर पृथ्वीचे राज्य भोगाल.
७) जगात सर्वात खोटारडा माणूस मोबाईलवर बोलणारा. घरी असला तरी ट्रेनमध्ये आहेसांगेल.
८) मुनी सांगती परमार्थ, संत सांगती मतितार्थ, माझ्या सारखा सामान्य म्हणतो दिड वीत पोटाची खळगी हाच खरा जीवनार्थ
९) मुलांना आणि बायकोला सुखी ठेवा, देव आपोआप भेटेल.
१०) आलेल्या पाहुण्याला चहा घेणार का, जेवणार का असे विचारू नका. चहा घेऊनच जा,जेवल्याशिवाय जाऊ नका असे म्हणा.
ह्या सोबत अनेक इतर ही वचने त्यांनी लिहिलेली आहेत आणि तसेच आयुष्य ते जगतात.आजपर्यंत मी त्यांच्या घरी गेले आहे आणि न जेवता परत आले असे कधी ही झाले नाहीमग ती सकाळ असो वा संध्याकाळ.
संतांनी सत्संग वर्णन केला आहे तो काही वेगळा असतो का?

हृदयाच्या अंतर्हृदयाला....

कोठुनि येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला ।।
येथे नाही तेथे नाही, काय पाहिजे मिळावयाला? कुणीकडे हा झुकतो वारा? हाका मारी जीव कुणाला?
मुक्या मनाचे मुके बोल हे घरे पाडिती पण हृदयाला तीव्र वेदना करिती, परि ती दिव्य औषधी कसली त्याला !
- बालकवी

पोतडी


मध्यंतरी सहज मी एकाला म्हटले, तू आमच्या दोघींच्या मैत्रीत उत्प्रेरक होतास तर त्याला मजा वाटली. म्हणाला, "शाळा संपल्यावर पहिल्यांदाच हा शब्द ऐकला"...परवा मिपा वर कोणी तरी अभिप्रायात "गृहितक" लिहिले आणि परत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला....
को-बा-को,पुंकेसर,बेरी बेरी,पडताळा,हरितद्रव्य,प्रकाश संश्लेषण,समलंब त्रिकोण,मूलद्रव्ये,म.सा.वि.....
जणू मराठी माध्यम गणित, विज्ञान विषयाच्या पा.पु.म.नि. पुस्तकातील शब्दांची पोतडीच उघडली...

अभिनयक्षमता

लहान मुले आपले म्हणणे खरे करून दाखवतातच, त्यांना बरोब्बर पालकांना कसे गुंडाळायचे ते माहित असते....
विशेषत: TV वर त्यांचा आवडता कार्यक्रम असेल तर कोणाची काय बिशाद दुसरा कार्यक्रम / दुसरी वाहिनी लावायची...

http://www.youtube.com/watch?v=DcLVJ2U63qE

बा. भ. बोरकर म्हणतात...




देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, सावळे की गोमटे या मोल नाही फारसे...

तुमचा ह्या गोष्टीवर थोडातरी विश्वास आहे का?

असल्यास -

गोरी बायको / नवरा हवा हा बालहट्ट सोडणार का?
किंवा
आपण विवाहित असल्यास इतरांना हा बालहट्ट सोडायला प्रवृत्त करणार का?

डायलॉग

माझे एक काका आहेत त्यांना कोणी विचारले की काय, ठीक चालले आहे ना... की ते म्हणतात, अहो कसले काय... दात पांढरे झालेत, केस हलायला लागलेत...
कधी म्हणतात... आम्ही जिलबीसारखी सरळ माणसे.. चाल्लयं कसेतरी..
असे त्यांचे संवाद झक्कास असतात. ते प्रत्येक वाक्याला हुकुमी टाळी घेऊ शकतात.
तसेच आम्ही सगळी भावंड एकत्र आलो की अनोळखी, अनवट किंवा ठेवणीतले मराठी शब्द बोलतो आणि सर्वच मराठी माध्यमातून आले असल्याने हे भारी भारी शब्द समजून घेऊ शकतात आणि त्यावर कोट्या करू शकतात. बरेचदा आम्ही मराठी नाटकातील संवाद सुद्धा प्रसंगानुरुप चपखलपणे फेकतो.
म्हणजे हेराफेरी (परेश रावलचा), शोले अश्या चित्रपटातील खुमासदार हिंदी संवादसुद्धा वापरतो पण क्वचित्. (कारण मराठीचा जाज्वल्ल्य अभिमान नसानसांत मुरलाय ना...) हे मराठी संवाद फेकण्यासाठी "असा मी असामी" ही आमचे सर्वात आमची सर्वांत आवडती संहिता आहे... कुठलाही प्रसंग असो फेका असामीतला एक डायलॉग.
पण परवाच माझा भाऊ म्हणालाय, आगरी रामायणात असेच धमाल संवाद आहेत, मी लवकरच त्याचा पण रट्टा मारणार आणि मग करणार चालू त्यातील पण संवाद फेकणे ...

आयुर्वेद

पुण्यात नारायणपेठेत पत्र्या मारुतीजवळ वैद्य शेंडेशास्त्रींचा दवाखाना आहे. पूर्वी तिथे मोठी शेंडी कार्यरत होती पण आता तेथे बाळासाहेब नावाची छोटी शेंडी काम करते.
हे बाळासाहेब सुद्धा तेव्हढ्याच कमालीचे कुशल कारागिर आहेत. आजही ते काही नसा दाबून स्थानिक भूल न देता सहजतेने दात काढतात. पण त्यांचा भर दात न काढता शक्यतो ते टिकविण्यावर असतो. ते दर शनिवारी सकाळी १०.०० वाजता मुंबईत दादर स्थानकाबाहेर माधववाडीत येतात आणि आम्ही केवळ दातांवरच नव्हे तर सर्वच आजारांवर त्यांचा सल्ला घेतो. असो.
लेखाचा मुद्दा की आयुर्वेद हे एक अजब, गुढ, गहन ज्ञान आहे.
मी फार पूर्वी वाचले होते. एक सोनार असतो त्याला प्रचंड डोकेदुखीचा त्रास असतो, सगळे पाश्चिमात्य औषधोपचार, क्ष-किरण इ. तपासण्या होतात पण रामबाण उपाय होत नाही. मग त्या सोनाराला एका वैद्याची महती कळते आणि तो सोनार मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे येतो. ते वैद्य फक्त एका वैद्यकीय सुरीने कानाजवळ एक छेद देतात व वैद्यकीय चिमट्याने तिथून पाव ग्रॅम सोने काढतात. त्या सोनाराची डोकेदुखी कायमची थांबते.
झाले असे होते की सोने फुंकता फुंकता त्या सोनाराच्या नाकातून बारीक सोन्याचे कण जात राहायचे जे नासिकामार्गातून पुढे जाऊन एका विशिष्ट ठिकाणी साचत राहायचे व तिथे इतर श्लेष्म घटकांमुळे त्याचा गोळा बनलेला होता. ज्यामुळे त्या सोनाराला डोकेदुखी जडलेली होती.
गेल्या शतकात संगमनेरात बाजारपेठेत गुणे वैद्य राहायचे. त्यांच्याकडे अनेक क्लिष्ट आणि ज्यावरइतर अभ्यासक्रमाच्या डॉक्टरांनी ह्यावर इलाज नाही असे सांगितले असायचे अश्या अनेक दुर्धर रोगांवर इलाज व्हायचा आणि अनेक केईएम च्या डॉक्टरांनी त्यांना ह्याबद्दल प्रशस्तिपत्रे लिहिली होती.

सुंदर चित्रे...





रवि परांजपे ह्यांची...

त्यांची इतर चित्रे पण छान आहेत...
एक मराठी कलाकार म्हणून त्यांच्याबद्दल अभिमान आणि ममत्व वाटते...
त्यांच्या चित्रांची मी पंखा आहे...

१७६०

मी एकदा शिवडी पुलावरून चालताना सोंगट्या (गोट्यांची बहिण) विकायला ठेवलेल्या पाहिल्या, सहज मनांत विचार आला "सोंगटी" शब्द कशावरून आला असेल. मग लक्षात आले,"सोम+गोटी" चा बोलीभाषेतील उच्चार सोंगटी झाला. सोम म्हणजे पांढरा किंवा चंद्र. पांढरी किंवा चंद्रासारखी दिसणारी गोटी ती सोंगटी.
तसेच आपण सहज म्हणतो, "ती मला १७६० गोष्टी सांगत होती". आता हा १७६० कुठून आला असेल असा विचार बरेच दिवस करत होते. पण उत्तर मिळत नव्हते.
परवा सहज वाचले कि १७६० साली पानिपतची लढाई झाली. मनांत विचार आला की पूर्वी म्हणत असतील, "१७६० च्या गोष्टी सांगत बसू नकोस (पाल्हाळ नको, मुद्द्याचे बोल)." त्यावरूनच कदाचित् वाक्प्रचार झाला असेल, "१७६० गोष्टी सांगणे".
सध्या धानी हा रंग कसा असेल व कुठल्या धान्यावरून आला असेल या वर विचार चालू आहे.आपल्याला भेडसावतात का असे शब्द?

धारावी दर्शन सोहळा...

आपण मुंबईत गाडीतून जाताना महालक्ष्मी पुलावर बरेचदा परदेशी पर्यटकांचा थवा दिसतो. तो महालक्ष्मीचा धोबीघाट पाहायला जमलेला असतो जे तद्दन बकवास ठिकाण आहे. आपली भारतीय मार्गदर्शक मंडळी (Tourist Guide) असली ठिकाणे दाखवून भारताची नक्की कुठली प्रतिमा दाखवू पाहतात देव जाणे.
माझे तर मत आहे की अश्या मार्गदर्शक मंडळींना हिरव्या सोललेल्या फोकाने बडवले पाहिजे.
अशीच मध्ये एकदा झोपडपट्टी पर्यटन (Slum Tourism) / धारावी दर्शन सोहळा अशी टूमनिघाली होती.
शिरस्त्याप्रमाणे सब से तेज वाहिन्यांची गिधाडे धारावीकरांना मते विचारायला गेली तेव्हा तिथल्या सुबुद्ध नागरिकांनी त्यांना सांगितले की हे परदेशी पर्यटक आपले पाहुणे आहेत त्यांना आम्ही जरुर मान देऊ मात्र त्यांना इथे घेऊन येणारी जी भारतीय मंडळी आहेत त्यांना चांगलाच चोप देऊ.
त्या नंतर कोणी ही झोपडपट्टी पर्यटनाचे नाव काढलेले दिसत नाही.

प्रश्नच प्रश्न चहूकडे...

मुळेकाठच्या एका दुकानात एक गिर्‍हाईक येते. दुकानदाराचे लक्ष नाही. गिर्‍हाईक घुटमळते.
शेवटी आपल्या दुकानात चोर शिरला असावा अश्या दृष्टीने पाहून दुकानदार वसकन् त्याच्यावर ओरडतो,
"क्वाय हवांय?"
"अहो, असे अंगावर काय येताय?""मग काय मुका घेऊ तुमचा?"
गिर्‍हाईक ओशाळते. भीत भीत विचारते,"डिक्शनरी मिळेल काय?""एक का हजार मिळतील, पोटमाळ्यावर हव्व्या तितक्या आहेत.""पण...""पण नाही आणि परन्तु नाही, आमचा नोकर रजेवर आहे. समोरच्या पेण्टराच्या दुकानातून आणा शिडी आणि घ्या हवी ती शोधून आणि हो, अर्ध्या तासात खाली उतरा. आम्ही रात्री दुकान ८ च्या ठोक्याला दुकान बंद करतो. नाहीतर रात्रभर उंदीर व घुशींसोबत गरबा खेळत बसावा लागेल."
(गोष्ट कल्पित: लेखक अनेक).
प्रश्न क्र. १: मराठी भाषा उद्धट आहे का?___________________________________________
माहिमचे एक श्री. हळक्षज्ञ, अतिशय व्यासंगी भाषांतरकार. मला एकदा म्हणाले, "मला फक्त ७५ पैसे (प्रतिशब्द) काम मिळते. तुमच्याकडे जास्त पैसे देणारे ग्राहक असतील तर मला द्या."
मी ठीक आहे असे म्हटले. थोडे दिवसांनी एका गुजराथी व्यापार्‍याचे काम आले जो लगेच व योग्य पैसे देणार होता. ते मी श्री. हळक्षज्ञ यांच्याकडे पाठवले.
त्यावर ह्या महोदयांनी दीड पान स्वत:ची महती व पुढे अर्धा पान मूळ हस्तलिखित किती भिकार आहे हे त्याला लिहून पाठवले. तो व्यापारी काय ते समजला.
दुसर्‍या एका प्रसंगात एक माहितीतला दिल्लीचा भाषांतरकार त्याला निकड होती म्हणून जास्त पैसे देऊन काम करून घ्यायला तयार होता. मात्र मागील प्रसंगावरून शहाणी होऊन मी ते काम श्री. हळक्षज्ञ आणि अजून २-३ जणांना पाठवले.
त्यावर श्री. हळक्षज्ञ आपल्याला आलेले दिल्लीकरांचे अनुभव - मला, त्या भाषांतरकाराला आणि वर त्या २-३ जणांना आपल्या खास शैलीत २ पाने लिहून पाठवले.
त्याखाली एक ओळ माझ्यासाठी. दिल्लीच्या लोकांची कामे मला पाठवू नयेत.
तिसर्‍या प्रसंगात मला एका अमेरिकन कं. चे $ मध्ये काम मिळाले पण मलाच वेळ नव्हता. पण चांगली संधी का सोडावी म्हणून इतर मराठी भाषांतरकारांना वेगळे आणि श्री. हळक्षज्ञ ह्यांना एक वेगळे असे पत्र लिहिले (ज्यात त्या अमेरिकन कं. विषयी काहीही माहिती लिहिली नाही).
त्यावर श्री. हळक्षज्ञ यांचे मला एक पत्र ज्यात त्यांना आधीच कसे २ मोठ्या कंपन्यांचे सध्या काम मिळाले आहे याचे रसभरीत वर्णन आणि त्याची २ मान्यवर भाषांतरकारांना CC.
शेवटी मला त्या दोन मान्यवरांचे फोन, "हे विद्वान कोण?" असे विचारणारे.
(सत्यघटना, सर्व ई-पत्रव्यवहार इंग्रजीतून).
प्रश्न क्र. २ : मराठी भाषिक उद्धट आहे का? ___________________________________________
प्रश्न क्र. ३ : मुळात मराठी भाषा उद्धट नसून रेल्वे, बँक, महापालिका अश्या सार्वजनिक ठिकाणी वापरल्या जाणार्‍या मराठीचा हेल (Tone) उद्धट आहे का?

चांदण्यात रात्र रात्र...

चॅलेंज खेळ मस्तच. योग्यवेळी चॅलेंज म्हणायचे, योग्यवेळी पास म्हणायचे आणि निरागस चेहरा ठेऊन बिनचूक खोटी पाने घुसडायची.
तसे आम्ही बदाम ७, गुलामचोर, ५-३-२, रमी, ७-८, छब्बु, ३०४, लॅडिस सुद्धा खेळतो. पण खरी मजा मेंढीकोट आणि कॅनवेस्टा खेळताना येते ती.
एका पावसाळ्यात गाड्या बंद पडल्याने २५-३० जण आमच्याकडे अडकली होती. २ रात्रंदिवस मेंढीकोट. सोबत डबेभरून चिवडा आणि चकल्या.
आजही आम्ही कोकणात गेलो की चांदण्यात रात्र रात्र पत्ते खेळतो. १५-१६ जण, ३ कॅट घेऊन मेंढीकोट आणि जर तरुण पिढीतील खेळाडू जास्त असतील तर कॅनवेस्टा. मग भिडू पाडताना शक्यतो नवरे आणि त्यांच्या बायका एकाच गटात येईल असे पाहायचे म्हणजे भांडणाची खुमारीच वेगळी.
तसे आमच्यात कोणी लबाडी करतच नाहीत असे नाही पण सगळा भर शक्यतो पडलेली पाने लक्षात ठेवणेआणि अंदाज बांधणे (जे हमखास चुकतात. मग आरडाओरडा, एकमेकांना टोमणे मारणे...).
मात्र एक आहे की पत्ते खेळताना भले एकमेकांच्या छाताडावर बसू, एकमेकांच्या झिंजा उपटू पण पत्ते खेळणे संपले की भांडणे पण संपतात.

विडंबन सम्राट

सध्या मनोमिसळवर विडंबनाची लाट आली आहे (ज्यात आम्ही वाहून गेलेलो आहोत, नाकातोंडात पाणी गेल्याने हातपाय झाडतोय कसेतरी).
पण सगळ्या विडंबनकारांचा गुरु आणि माझा आवडता एक आणि एकच. जसपाल भट्टी. ज्याच्या फ्लॉप शो, उल्टा पुल्टा ने एकेकाळी लोकांना वेड लावले होते. जो दूरदर्शन सारख्या सरकारी वाहिनीवर खुशाल टेलिफोन, सरकारी बाबू लोक, कंत्राटदार इ.इ. ची टोपी उडवायचा. तो, त्याची बायको आणि विवेक शक म्हणजे भन्नाट तिकडी. ह.ह.पु.वा.
मला तर वाटते की त्याने मंडी हाऊस मधले लोक पैसा कसा खातात आणि भिकार कार्यक्रम कसे मंजुर करतात ह्यावर पण एक भाग बनविला होता पण दूरदर्शनवाल्यांनी त्यावर दुष्टपणे कात्री चालवली.

भटकंती गाणी -२

जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
(चाल - अशोक कुमारच्या 'रेलगाडी रेलगाडी' ची)
जम्बो जेट जम्बो जेट,लंडन-मुंबई प्रवास थेट,जगलो वाचलो पुन्हा भेट,जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
विमानात होता माथेफिरु,त्याचा झाला भेजा सुरू,तो म्हणाला पायलटला,विमान वळव बैरुटला,विमान उतरव त्या शेतात,पिस्तुल आहे ह्या हातात,जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
ठेवीन प्रवासी तुमचे ओलीस,मग काय करतील तुमचे पोलीस,जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽईअरे जम्बो जेट जम्बो जेट झुऽऽऽऽऽऽऽऽऽऽई
मधल्या ओळी आठवत नाहीयेत, कोणाला आठवल्या तर जरूर लिहा आणि तुम्हाला जर अशी भटकंती गाणी येत असतील तर भटकंती - ३, ४ इ. भाग सुद्धा लिहिलेत तरी हरकत नाही.

वैदर्भी बोली

वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही.
बुवा लिहितात -
पार्थ म्हणे गा हृषीकेशी,या युद्धाची ऐशीतैशी,बेहत्तर आहे मेलो उपाशी,पण लढणार नाही.
धोंड्यात जावो हि लढाई,आपल्या बाच्याने होणार नाही,समोर सारेच बेटे, जावाई,बाप, दादे, काके.
अरे लढाई असते का सोपी ..मारे चालते कापाकापी,कित्येक लेकाचे संतापीमुंडकी ही छाटती.
मग बायका बोंबलती घरी,डोई बोडून करती खापरी,चाल चाल कृष्णा माघारी,सोड पिच्छा युद्धाचा.
ऐसे बोलून अर्जुन,दूर फेकून धनुष्यबाण,खेटरावाणी तोंड करूनमटकन खाली बैसला.
मग कृष्ण अर्जुनाला समजावतो -
कृष्ण म्हणे रे अर्जुना,हा कोठला रे बायलेपणा,पहिल्यानं तर टणटणाउडत होतासी लढाया.
तू बेट्या मूळचाच ढिला,पूर्वीपासून जाणतो तुला,परि आता तुझ्या बापाला हीसोडणार नाही बच्चमजी.
आहाहा रे भागूबाई,म्हणे मी लढणार नाही,बांगड्या भरा की रडूबाईआणि बसा दळत.
वर्‍हाडी बोलीची लज्जत समजण्यासाठी एव्हढे नमुने पुरे व्हावेत.
वि. सू. - मूळ कवीची इथे लेखनास अनुमति प्राप्त, चिंतातुर जंतुंनी काळजी करू नये ही वि.वि.

भाग्यवान

नक्की भाग्यवान कोण असतं असा मला सध्या प्रश्न पडला आहे. मी आम्हा भावंडांच्यात मधली होते. माझी मोठी बहिण बाबांची लाडकी आणि लहान भाऊ आईचा लाडका. त्यामुळे मला वाटायचे ते दोघेही भाग्यवान.
लहान भावाला वाटायचे सगळ्यात लहान असले की सगळे हुकुम गाजवतात त्यामुळे सर्वांत मोठे होणे भाग्याचे. मोठ्या बहिणीला वाटायचे की मोठी म्हणून जबाबदारीची जाणीव लवकर येते त्यामुळे सर्वांत मोठे असण्यात हशील नाही. त्यापेक्षा शेंडेफळ होण्यात खरी मजा आहे.
तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले होणे ह्यासारखे वाईट काही नाही आणि एकुलते एक अपत्य असणे ह्यासारखे भाग्याचे काहीच नाही.

ब्रेकिंग न्यूज


अजिबात वेळ घालवू नका. तडक टीव्ही लावा. राष्ट्रव्यापी समस्या.
तुम्ही ह्या बाबतीत काही करणार आहात की नाही?


भटकंती गाणी -३

गाऽऽऽऽऽऽऽऽर, गार डोंगराची हवा न् बाईला सोसंना गारवा...गाऽऽऽऽऽऽऽऽर अहा गाऽऽऽऽऽऽऽऽर ओहो गाऽऽऽऽऽऽऽऽरडोंगराची हवा न् बाईला सोसंना गारवा ।।धृ।।
लिंबूनारळ घेऊन हाती,काळूबाईला इनवूं किती..या काळूच्या ह्या बाळूच्यामळवट भरियला न्बाईला सोसंना गारवा ।।१।।
साडी चोळी घेऊन हाती,काळूबाईला इनवूं किती..या काळूच्या ह्या बाळूच्यामळवट भरियला न्बाईला सोसंना गारवा ।।२।।
हळदकुंकू घेऊन हाती,काळूबाईला इनवूं किती..या काळूच्या ह्या बाळूच्यामळवट भरियला न्बाईला सोसंना गारवा ।।३।।

योगायोग



माझ्याकडे एक सुंदर मराठी शुभेच्छापत्र आहे. काय आश्चर्य, त्यातल्या ओळी ह्या चित्राला बिनचूक बसतात. अगदी एका ओळंब्यात. ह्या योगायोगाची गंमत वाटली कारण दोन कुठल्या वेवेगळ्या जगातल्या गोष्टी. एक नेटवरची तर एक छापील कागदावरची. म्हणून हे चित्र आणि त्या ओळी इथे देत आहे.



आम्ही दूध पितो.मांजरही दूध पिते.पण मांजराच्या ते अंगी लागते.
आम्ही मरेस्तोवर जगतो,मांजरही मरेस्तोवर जगते पणमांजराला ब्लडप्रेशरचे दुखणे नसते.
आम्हाला देव माहित आहे.मांजराला ते ही कळत नाही...पण त्याचा आत्मा भटकतराहिल्याचे कोणी ऐकले नाही.
पृथ्वीवरील सर्वांत हुशार प्राणीमाणूस असेलहीपण त्यानेही कधी तरी निवांतपणेम्यँव म्हणायला हरकत नाही.
खरोखरच जीवनात आपण हा निवांतपणाच घालवून बसलो आहोत. म्हणूनच येणारा सप्ताहांत आणि नवे वर्ष निवांतपणे घालवा...

भटकंती गाणी -१

किल्ल्यांवर भटकंती करताना आमची काही विशेष आवडती गाणी असायची आणि आम्ही तीअगदी आवडीने हेल काढून घसा बसेपर्यंत म्हणायचो.
किल्ल्यामधे किल्ला शिवाजी आत कसा शिरला, जंबोजेट, काळूबाई, सो गया ये जहाँ, माझी सुशीला, संध्याकाळी संध्या काळी असली अनेक भन्नाट गाणी. ही गाणी कोणी लिहिली माहित नाहीत आणि ज्याने लिहिली त्याच्या मनात बुद्धिसंपदा, स्वामीत्व हक्क इ. खुळचट कल्पनानक्कीच नव्हत्या. आम्ही ती गाणी नुसती वापरत नसू तर जो तो जमेल तशी त्यात भरच घालायचा.
त्यातील माझी सुशीला हे एक ढासू गाणं खास तुमच्यासाठी (चिंतातूर जंतुंनी कविचा पत्ता कळवल्यास लगेच कविची अधिकृत परवानगी सुद्धा घेण्यात येईल) जसे आठवेल तसे.
माझी सुशीला,माझी सुशीला,माझी सुशीला,माझी सुशीला
उंच होती गोरीपानजणू काही अप्सरामाझी सुशीला, माझी सुशीला,माझी सुशीला, माझी सुशीला
गेली होती एकदा तीमुळेकाठी फिरायलापाय घसरून आत पडलीतिच माझी सुशीला,
म्हातार्‍याला धक्का बसलातो ही गेला स्वर्गाला,म्हातारा गेला,इस्टेट गेली मीच राहिलो एकटा..
आपण ह्या गाण्यात साहित्यिक मूल्य वैगरे शोधायला गेलो तर निराशाच पदरी येईल पण आजही ही गाणी आठवली कि ते मंतरलेले, चिंतामुक्त दिवस आठवतात आणि मनाला एक निखळ आनंद मिळतो.

न्यूनगंड

शन्ना नवरेंचे शन्ना डे नावाचे मस्त पुस्तक आहे त्यातील ते एका लेखातील प्रसंग...
लेखक एकटे राहणार्‍या मित्राच्या घरी जातात तर त्याच्या घरी भूकंप झाल्यासारखी स्थिती... सर्व वस्तु इकडे तिकडे विखुरलेल्या... पलंगावर तर स्मरणशक्ती स्पर्धेत मेजावर मांडलेल्या असतात तश्या अपरंपार वस्तु असतात.
लेखक विचारतो, "अरे हे काय?"
तो उत्तरतो, "ह्याला पसारा म्हणतात"
त्यावर शन्ना म्हणतात, "अरे पण तू झोपतोस कसा?" त्यावर तो मित्र शांतपणे पलंगावर घातलेल्या चादरीची दोन टोके शन्नांना देतो उरलेली दोन आपण धरतो आणि त्याचे गाठोडे करतो. कपाटातून दुसरी चादर काढतो. पलंगावर घालतो आणि मस्तपैकी आडवा होऊन म्हणतो, "हे असे."हे पुस्तक वाचून अनेक वर्षे झाली तरी तो लेख अजुनही मला लक्षात आहे कारण मी स्वत:पसारा-भक्त आहे. मला पसार्‍यातून अचूकपणे मला हवी ती वस्तु मिळते.
माझे टापटीप नातेवाईक आले आणि त्यांनी स्वच्छतेवर व्याख्यान दिले की मला न्यूनगंड की काय म्हणतात तो छळतो पण तो फार काळ टिकत नाही. नातेवाईक गेल्यावर घटका-दोन घटका हा न्यूनगंड मला ग्रासतो. पुन्हा ये रे मागल्या...

शिळा सप्तमी

आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणार्‍या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला.

शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचापण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात.

कृति - भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, पावभाजीसाठी करतो तसा बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कूट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा. शिळ्या भाकरीसाठी पण हीच कृति पण त्यासाठी भाकरीचे बारीक तुकडे करून घ्यावेत.

ता. क.: कांदा बारीक चिरू न शकणारे, स्वयंपाक म्हणजे एक पाटी टाकणे असे विचार असणारे, शरीरयष्टी जागरूक (figure cautious) इ. लोकांनी ह्या पदार्थाच्या वाटेला जाऊ नये.

शिळ्या भाताचा छान पदार्थ म्हणजे रात्री भात दुधात कालवायचा आणि विरजण लावायचे. दुसर्‍या दिवशी त्यात उसळी मिरची अथवा पोलं (लाल सुकी मिरची तेलात तळून) आणि मीठ घालून खायचा. प्रवासात न्यायला पण चांगला.

दडपे पोहे

हा पदार्थ केवळ चांगली फोडणी करण्यावर अवलंबून असतो. फोडणी काजळीपूर्वक केली की पहिल्या घासातच मन तृप्त होते.
फोडणी करण्याची पद्धत - १) फोडणीचे साहित्य नेहेमी तयार ठेवावे मगच तेल गरम करायला घ्यावे. २) सुरवातीला पोह्याच्या हिशोबाने तेल घ्यावे (साधारण अर्ध्या किलो पातळ पोह्याला ३ टेबलस्पून तेल) आणि कढल्यात मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. ते जरा कोमट झाले की हाताने अर्धा चमचा मोहोरी घालावी. ३) ती तडतडायला लागली की हातात अर्धा चमचा उडिदाची डाळ तयार ठेवावी. वाट पाहावी. मोहोरीच्या तडतडण्याचा आवाज बंद झाल्याक्षणी उडिदाची डाळ घालावी. ४) ती जरा केशरी झाली की लगेच शेंगदाणे घालावेत. ५) २-४ क्षणांनंतर चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. ६) कांदा पारदर्शक झाला की हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. ७) ते तुकडे जरा मऊ झाले की थोडे हिंग शिंपडावे. ८) लगेचच अर्धा चमचा हळद घालावी आणि विस्तव बंद करावा. ९) मग अर्धा चमचा तीळ घालावे. (तीळ फोडणी विस्तवावर असताना घातले तर तडतडून भांड्याच्या बाहेर उडतात). फोडणी तयार.
(हिच फोडणीची कृति सर्वत्र वापरावी मात्र ज्या फोडणीत लसुण घालायची असते त्यात कांदा घालायचा नसतो आणि आमटी करताना फोडणीत मेथीचे दाणे पण घालतात. ह्यात नमूद केलेला चमचा हे माप मिसळण्याच्या डब्यात जो छोटा चमचा असतो त्याचे आहे.).
आता पातळ पोहे घ्यावेत (भाजून घेतले तर छानच अथवा तसेच पण चालतात). त्यात फोडणी घालावे. पोहे न भाजता कच्चेच घेतले असतील तर हाताने यथेच्छ दडपावेत. मग त्यात वरून कच्चा चिरलेला कांदा, टोमटो, कोथिंबीर, खवलेले खोबरे (एकत्र) जरा हाताने चुरून घालावेत. मग फक्त झार्‍याने एक हात मारावा. दडपे पोहे तयार.
एकावेळी मस्त वाडगाभर किंवा त्यापेक्षा जास्त खावेत. एक घास ३२ वेळा चावून खायला हरकत नाही कारण प्रत्येक चावा वेगवेगळा स्वाद देतो. (ह्या पोह्यात फोडणी करताना मिरची ऐवजी सांडगी मिरची पण घालता येते.)

दही बटर

घट्ट दही प्रथम थोडेसे पाणी घालून नीट घुसळून घ्यावे. त्यात रुचीप्रमाणे साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे यांची भुकटी, चाट मसाला घालावे. पुन्हा थोडे एकजीव करावे.
मग कोमटपेक्षा थोडे गरम पाणी करावे, वाडग्यात घ्यावे आणि बटर (खारी बिस्किट कुटुंबातले) एकावेळी २-३ त्या कोमट पाण्यात तळाकडच्या बाजूला बुडवावेत. तो भाग किंचित् मऊ झाला असे वाटले की बटर पालथे करून शिखराचा भागसुद्धा मऊ करून घ्यावा.
दोन्ही भाग पुरेसे मऊ झाले वाटले की एक एक बटर दोन हातांच्या तळव्यात चेपून दह्यात घालावा. मराठमोळे दहीवडे तयार. सर्व साहित्य असेल तर हा पदार्थ सातव्या मिनिटाला तयार.
वि. सू. : १) बटर शक्यतो मध्यम आकाराचे चांगल्या प्रतिचे असावेत (जिरे बटर). २) पाणी जास्त गरम असले तर हात भाजतो आणि कमी गरम असेल तर ४-५ बटर मऊ होईपर्यंत थंड होते. ३) पहिला प्रयत्न मनाजोगा झाला नाही तर नाउमेद होऊ नये. २ र्‍या -३ र्‍या वेळेपासून सर्व नीट जमून येते. ४) लहान मुलांना आवडते. पण बरेचदा करू नये कारण बटर मैद्यापासून बनविलेले असतात. मजा म्हणून महिन्यातून १-२ वेळा हरकत नाही. ५) पाहुण्यांना देताना थोडी बुंदी, लाल डाळिंबदाणे पेरून द्यावी. ६) बटर फार वेळ पाण्यात किंवा दह्यात ठेऊ नयेत. लगेच पोटात टाकावेत नाही तर ते पाणी शोषून घेतात आणि फुगून पानचट लागतात.

Sunday 24 August 2008

कुसुम्‍बी






मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले । घन गर्द सावल्‍यांनी आकाश वाकलेले ।। पाऊस पाखरांच्‍या पंखात थेंबथेंबी । शिडकाव संथ होता झाडे निळी कुसुम्‍बी ।।
तळपायावर मेंदी ओली
अनघड कुठल्‍या गाण्‍यामधली । मंद्र मदालस तिच्‍या निळ्‍या डोळ्‍यांत उतरली लाल पाखरे नभाळ्‍यातली ।। थिरक बिथरली ती स्‍वर ओली
पैजणातली हळवी बोली ।
तळपायावर मेंदी ओली
अन्‌ भिंतीवरला रंग अबोली ।।

-
कवि - ना.धों. महानोर

काव्यशास्त्रविनोद:। (काव्यशास्त्राद्वारे विनोद)

चितां प्रज्वलितां दृष्ट्वा वैद्य: विस्मयम् आगत: ।
नाहं गतो न मे भ्राता कस्य इदं हस्तलाघवम् ।।

भावार्थ -चितेला जळताना पाहून वैद्यबुवांना आश्चर्य वाटले, ते मनांत म्हणाले, ह्या व्यक्तिवर उपचार करायला
मी सुद्धा गेलो नव्हतो आणि माझा भाऊ पण. मग कोणाचे बरे हे हस्तकौशल्य?

सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...

प्रिय गुरुजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा
जगात प्रत्येक बदमाशागणिक
असतो एक साधूचरित पुरुषोत्तम.
स्वार्थी राजकारणी असतात जगात
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.

मला माहित आहे
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत... तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा त्याला विजयाचा आनंद संयमाने घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला

गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !

जमेल तेवढं दाखवित चला त्याला
ग्रंथ भाण्डाराचं अद्भुत वैभव,
मात्र त्या बरोबरच
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला.
पाहू दे त्याला
पक्षांची अस्मान भरारी...
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...
आणि हिरव्यागार डोंगरउतारावर डोलणारी चिमुकली फुलं.

शाळेत त्याला हा धडा मिळू दे -फसवून मिळवलेल्या यशापेक्षा
सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.

आपल्या कल्पना आपले विचार
यांच्यावर दृढविश्वास ठेवायला हवा त्यानं बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी. त्याला सांगा
त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्दल घडवावी.
माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणार्‍या भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद
त्यानं कमवायला हवी.
पुढे हेही सांगा त्याला
ऐकावं जनांचं अगदी सर्वांचं... पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्य तेव्हढं स्वीकारावं.

जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा - हसत राहावं उरातलं दु:ख दाबून.
आणि म्हणावं त्याला,
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको.

त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला
अन् चाटुगिरीपासून सावध राहायला. त्याला हे पुरेपुर समजवा की
करावी कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा !

धिक्कार करणार्‍यांच्या झुंडी आल्या तर काणाडोळा करायला शिकवा त्याला,
आणि ठसवा त्याच्या मनावर –
जे सत्य आणि न्याय्य वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.

त्याला ममतेनं वागवा पण
लाडावून ठेऊ नका. आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा
अधीर व्हायचं धैर्य,
आणि धरला पाहिजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य.
आणखीही एक सांगत राहा त्याला –
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर.

माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे, खूप काही मागतो आहे... पण पहा..
जमेल तेव्हढं अवश्य कराच.

माझा मुलगा - भलताच गोड छोकरा आहे हो तो.

- श्री. अब्राहम लिंकन
- अनुवाद कवि श्री. वसंत बापट

तहान

सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।
व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।
फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।
राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास ।।
- म. म. देशपांडे.

छातीत निर्भय श्वास दे...

छातीत निर्भय श्वास दे...

छातीत निर्भय श्वास दे, साथीस कणखर हात दे।
फुत्कारणार्‍या संकटांना ठेचणारे पाय दे ।।

ध्येय दे उत्तुंग मंगलअढळ कैलासापरी ।
कारुण्य निर्मळ वाहू देहृदयातून गंगेपरी ।।

दीनदुबळ्या रक्षणा रे, शस्त्र दे माझ्या करी ।
दु:शासनाच्या दानवी रुधिरांत धरती न्हाऊ दे।।

निष्पाप जे ते रुप तुझे उमजूं दे माझे मला ।
धर्म, जाती, पंथ यांच्या तोड आता श्रुंखला ।।

नवीन गगने, नवीन दिनकर, नवीन चंद्राच्या कला,
या नव्या विश्वात तुझ्यान्याय नीती नांदू दे ।।

छातीत निर्भय श्वास दे...

स्वर्ग

कालच सकाळी मराठीच्या तासालापहिल्या बाकावरील तिने वळून पाहिले मलादोन्ही बाजूने कोपरखळ्या आल्या आणि शब्द मध्येच "मजा आहे तुझी साल्या"मग मी ही लिहिलं एक प्रेमपत्र,'प्रिये तुझ्या प्रीतीस होईन का ग पात्र?'संध्याकाळी निघालो तिच्या भेटीला,डोळे लाऊन बसलो तिच्या घरी जायच्या वाटेला,एव्हढ्यात तिची सुंदर सावली रस्त्यावर पडली अन् माझ्या हातातल्या गुलाबाची प्रत्येक पाकळी थरथरली,हृदयाचे दरवाजे लागले धडधडू,'तिच्याशी बोलायला विषय कसा काढू?'एव्हढ्यात एका गुंडाने तिची छेड काढलीअन् त्या गुंडाची कानफडं रंगली.. तिने धावत येऊन माझा हात धरला,'आता स्वर्ग मला दोनच बोटे उरला'पण क्षणातच या सुखाला झालो मी पारखा कारण ती म्हणाली,"कसा रे धावून आलास,पाठच्या भावासारखा..."

लिलीची फुले




लिलीची फुले

तिने एकदा चुंबिता,

डोळां पाणी मी पाहिले....!

लिलीची फुले

आता कधीही पाहता, डोळां

पाणी हे साकळे....!
- पु. शि. रेगे

घाटातील वाट,






घाटातील वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ ।।
निळी निळी परडी, कोणी केली पालथी, पान फुलं सांडली, वर आणि खालती ।।
खाली खोल दरी, वर उंच कडा, भला मोठा नाग, जणू वर काढून फणा ।।
भिऊ नका कोणी, पाखरांची गाणी, सोबतीला गात गात, खळाळतं पाणी ।।
- बालभारती इ. ३ री (१९८४)

परिमळांमाजी कस्तुरी...

जैसे हरळांमाजी रत्नकिळा ।
कि रत्नांमाजी हिरा निळा ।
तैसी भाषांमाजी चोखळा ।
भाषा मराठी ।।
जैसी पुष्पांमाजी पुष्प मोगरी ।
परिमळांमाजी कस्तुरी ।
तैसी भाषांमाजी साजिरी ।
भाषा मराठी ।।
पखियांमध्ये मयोरु ।
रुखियांमध्ये कल्पतरु ।
भाषांमध्ये मान थोरु ।
मराठीयेसी ।।
तारांमध्ये बारा राशी ।
सप्तवारांमध्ये रवि-शशि ।
या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी ।
बोली मराठीया ।।
- फादर स्टिफन्स

Saturday 23 August 2008

विदर्भातला शेतकरी..

शेतकर्‍यांना कर्जमाफ झाल्यापासून गेल्या विदर्भात ८ दिवसांत २२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. ही बातमी खरोखरच चटका लावणारी आहे.
बळीराजा हा आपला अन्नदाता, त्याच्या आत्महत्यांनी महाराष्ट्र ढवळून निघायला हवा पण दुर्दैवाने तसे झाल्याचे दिसत नाही ह्याचे मुख्य कारण ह्या सततच्या आत्महत्या केवळ विदर्भापुरत्याच मर्यादित आहेत.
तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे प्रामुख्याने ४ प्रकार१) कोकणातला २) खानदेशातला ३) विदर्भातला ४) मावळ प्रांतातला.
कोकण प्रांतात पाऊस भरपुर पण पाणी साठवण्याची तंत्रे कमी त्यामुळे बहुतांश पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाते. नगदी पीके (ऊस, कापूस) नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांकडे मुळातच पैसा कमी (पैसा मुख्यत: आंबा बागायतदारांकडे). परिणामी अंथरुण पाहून पाय पसरायची प्रवृत्ती. खानदेशात पण पाण्याचे दुर्भिक्ष्य पण द्राक्ष, केळीने हात दिलेला आहे. पश्चिम महाराष्ट्र सुपीक आणि जलसंपन्न तसेच सत्ताधार्‍यांचे लाडके अपत्य. सत्ताधार्‍यांचे अनेक निर्णय मावळाला विशेषत: बारामतीला पूरक.
राहता राहिला विदर्भ. माझे विदर्भाबद्दलचे ज्ञान तोकडे आहे पण मी असे वाचले आहे की विदर्भातील शेतकर्‍यांची सांपत्तिक स्थिती खरे तर कोकणी शेतकर्‍यापेक्षा बरी. पण सामाजिक दर्जा जपण्यासाठी करावे लागणारे खर्च विशेषत: प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष हुंडा, जेवणावळी, इतर लग्नखर्च, श्राद्धकर्मे खर्च अपरंपार.
कोकणातली लग्ने, बारशी किंवा इतर विधी झेपेल तेव्हढ्या परिस्थितीत होतो. हुंडा व्यवहार कमी. तो पण सक्तीचा नव्हे. मुख्य म्हणजे त्यासाठी मोठ्या रकमेची कर्जे काढली जात नाहीत. मात्र विदर्भात मुख्यत: लग्नखर्च अफाट आणि पिढ्यांपिढ्या त्यासाठी सावकारांकडे कर्जफेड चालूच. परिणामी ह्या कर्जाच्या डोंगरामुळेच विदर्भात आत्महत्यांचे लोण.

संस्कृत १

परवा एका लेखकू महाशयांनी विधान केले की त्यांना संस्कृत अजिबात कळत नाही. हे म्हणजे थोडेसे प्रसिद्धीचा हव्यास असणारे लोक जसे अधून मधून भडक व सवंग विधाने करून जनतेचे लक्ष वेधून घेतात तसा प्रकार झाला.
मी जर म्हटले, "मम नाम मृदुला । अहं दादरनगरे निवसामि । अहं प्रत्येक-बुधवासरे रेलयानेन वान्द्रानगरं गच्छामि । अहं युवति । अहं शिक्षिका । अहं अनुवादिका च। अहं भारतीया, महाराष्ट्रीया च। आशा नाम मम माता। अनंत नाम मम पिता।"
भले प्रत्येकालाच संस्कृत बोलता येत नसेल पण ही वाक्ये कळायला काही कठिणता असेल असे मला वाटत नाही. म्हणून मी म्हणेन संस्कृत अजिबात कळत नाही हे एक विसंगत विधान आहे.
पण भारतात बरेच जणांना संस्कृतभाषेबद्दल, भारतीय संस्कृतिबद्दल येता जाता काहीतरी पिंक टाकायची सवयच आहे. त्यातच त्यांना भूषण वाटते.
संस्कृतबद्दल सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही अध्यात्माची भाषा असून ती विशिष्ट जातीशी निगडित आहे. संस्कृतमधील आद्यकाव्य रामायण ज्यात १ लाखापेक्षा जास्त श्लोक आहेत ते एका वाल्मिकी नावाच्या कोळ्याने रचले आहे. संस्कृतमधील महाकवि कालिदास हा गुराखी (गवळी समाजाचा) होता. महाभारतात ज्याच्या तोंडी संस्कृत संवाद आहेत तो कर्ण सूतपुत्र (सूत=सारथी) होता. म्हणजे आजच्या काळातील ड्रायव्हर / टांगेवाला समाज.
इतकेच काय शंकराचार्याशी ज्याने वादविवाद केला तो चांडाळ (समाजाचा) म्हणजे स्मशानात काम करणारा होता. पण लोकांची उगीचच धारणा आहे की संस्कृत ही पुरोहित वर्गाची भाषा आहे आणि हा गैरसमज ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दोघांनीही मनापासून जपलाय. ब्राह्मण संस्कृतवरील आपला हक्क सोडायला तयार नाहीत आणि ब्राह्मणेतरांना आज संस्कृत शिकायची संधी असूनही ती भाषा न शिकता त्याविषयी मनात येईल ते ठोकून द्यायला आवडते. मनुस्मृती न वाचताच जाळणे हा तर नेतेमंडळींचा आवडता उद्योग.
पण अगदी अलिकडच्या काळात संस्कृत उत्तम बोलणार्‍यांमध्ये / जाणणार्‍यांमध्ये शांता शेळके (देवांग कोष्टी, विणकर समाज), मारुति चितमपल्ली (भटके विमुक्त समाज), बाबासाहेब आंबेडकर (दलित समाज), गुलाम दस्तगीर बिराजदार (मुसलमान) ही मंडळी सुद्धा आहेत.
इतकेच काय माझी मैत्रिण स्वाती जाधव उत्तम संस्कृत पण्डिता आहे. आज तिला मुंबईतील लोक संस्कृतसाठी प्रचंड मान देतात.
माझी तमाम वाचकांना एव्हढीच विनम्र विनंती की केवळ वरील मुद्द्याला अनुसरून मते द्यावीत कारण पुढील भागांत मी इतर मुद्द्यांकडे वळेनच.

संस्कृत२

सत्यकाम जाबाली - मूळ कथा : छांदोग्य उपनिषद (IV 39-43)
छोटा सत्यकाम एके दिवशी आईला म्हणाला, "आई, मला शिकावेसे वाटते".
आई म्हणाली, "जरूर शिक. ब्रह्मज्ञानी हो."
सत्यकाम म्हणाला, "आई, आपण कोण, कुठले?"
आई म्हणाली, "बाळ, बस इथे, मी तुला सगळे सांगते."
दुसर्‍या दिवशी सत्यकाम हरिद्रुम गौतम ऋषींच्या आश्रमात गेला आणि म्हणाला, "गुरुजी, मला तुमच्याकडे शिकायचे, ब्रह्मज्ञानी व्हायचे आहे".
गौतम ऋषी म्हणाले, "बाळ बस. पाणी घे. कोण तू? कुठून आलास? तुझे वडिल काय करतात? तुझे गोत्र काय?".
सत्यकाम दृढतेने म्हणाला, "गुरुजी, माझे नाव सत्यकाम. काल मला जे आई म्हणाली तेच आज मी तुम्हाला सांगत आहे. आई म्हणाली, बाळा, मी तरुण असताना अनेक ठिकाणी दासी म्हणून राहिले. तेव्हाच तुझा जन्म झाला. तुझे वडिल कोण हे मी पण निश्चित सांगू शकत नाही. गुरुजी विचारतील तेव्हा हेच सांग की जबालेचा पुत्र म्हणून मी जाबाली."
त्यावर गौतम ऋषी म्हणाले, "जो सत्य बोलतो, निर्मळ मनाचा, निष्कलंक विचारांचा, अंतर्बाह्य पारदर्शक असतो तोच ब्राह्मण होय (नोंद घ्यावी). हे सौम्या, थोड्या समिधा आण. आपण सत्यकामाचा उपनयन विधी करू".
पुढे असा हा दासीपुत्र सत्यकाम गौतम ऋषींच्या आश्रमात राहिला. त्याने वेदाध्ययन केले. तो वेद पारंगत झाला.
[मात्र सत्यकामाला ब्रह्मज्ञानाची आस लागली होती. गौतम ऋषींचा शिष्य असतानाच त्याला ब्रह्मज्ञान मिळते पण अगदी वेगळ्या पद्धतीने ज्याची एक वेगळी कथा आहे. जी पुन्हा कधीतरी.]
(वरील सर्वांचे संवाद संपूर्ण संस्कृतमध्ये, मूळ संस्कृतमधील उपनिषद संहिता मंडईत उपलब्ध)

आधुनिक दान

बरेचदा लोक मुंबईला समजण्यात चूक करतात. कोणाला ती भावनाशून्य वाटते कोणाला ती रूक्ष वाटते, कोणाला ती बाकीच्यांची पर्वा न करता सतत धावत राहणारी वाटते. पण हे मुंबईला आयुष्यातून १-२ वेळा वा कधीच भेट न देता केवळ चित्रपटातून मुंबईला पाहणार्‍यांचे मत झाले. खरी मुंबई वेगळीच आहे आणि ती वेळोवेळी स्वत:चे वेगळे दर्शन घडवते.
एका लेखकाने तिचे अचूक वर्णन केले आहे. तो म्हणतो, मुंबईच्या रेल्वेत दारातले लोक तुम्हाला आत घुसू देणार नाहीत पण एकदा का तुम्ही आत शिरलात की हेच लोक तुम्ही दारातून खाली पडू नये म्हणून तुमचा तोल सावरतील. तुम्हाला दरवाज्यात उभे राह्यला बळ देतील. तुम्हाला स्वत:त सामावून घेतील.
आम्ही मुंबईकरांनी प्रत्येक आपत्तीत हेच अनुभवले आहे. आणीबाणीच्या प्रसंगात मुंबईकर दुसर्‍यासाठी आपला जीव सुद्धा धोक्यात घालतो. संकटकाळी समोरच्याला जमेल ती मदत करणे हाच अस्सल मुंबईकराचा धर्म होय.
एकच उदाहरण द्यायचे म्हणजे बाँबस्फोट इ. झाल्यावर रक्त देण्यासाठी लागणारी रांग. अगदी लांब लांबहून लोक त्यासाठी ज्या ठिकाणी निकड असेल त्या ठिकाणी पोहोचतात. तरुण, वयस्क, बायका कोणीही मागे राहात नाही.
मुख्य म्हणजे रक्तदानात दिवाभीत समजला जाणारा गुजराती समाज विशेष पुढे आहे आणि मराठी तरुण थोडा मागे आहे. चालायचेच.
मी तर म्हणेन रक्तदान असे दान आहे की ज्यामुळे तुमच्या खिशाला काही तोशीस पडत नाही. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे फारच थोडे रक्त आपल्या शरीरातून काढले जाते जे २४ तासांच्या आत भरून निघते.
विशेषत: रक्ताचा कर्करोग किंवा काही दुर्मिळ आजारी व्यक्तींसाठी निरोगी लोकांनी मुद्दाम रक्त दिले पाहिजे. कारण अश्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. पण बरेचदा आपण बघतो की रुग्णांचे जवळचे नातेवाईकसुद्धा रक्त द्यायचे टाळतात. ह्या पाठी अनेक गैरसमज कारणीभूत आहेत.
१) रक्त दिल्याने एड्स होतो - हल्ली सर्वत्र इंजेक्शनसाठी "वापरा आणि फेकून द्या" पद्धतीच्या सुया वापरल्या जातात. रक्त घेताना लागणारी सर्व उपकरणे निर्जंतुक केलेली असतात.
२) रक्त दिल्याने अशक्तपणा येतो - जर रक्त देण्यापूर्वी व दिल्यानंतर भरपूर खाल्ले तर कुठल्याही प्रकारे अशक्तपणा अथवा थकवा जाणवत नाही असा माझा अनुभव आहे. कॉफी आणि बिस्किटे तर रक्तदान केल्यावर डॉक्टर लगेचच देतातच.
असो. ह्या विषयीचे इतर गैरसमज ह्या मंचावरील डॉक्टर मंडळी दूर करतीलच. पण मी एव्हढेच म्हणेन की दिलेल्या रक्तामुळे आपल्या शरीरात जी रक्ताची कमी निर्माण होते ती २४ तासांत भरून निघतेच वर आपल्या शरीराकडून नवीन रक्ताची निर्मिती झाल्याने प्रसन्न वाटते.
भारतीयांसाठी दुवा क्र. १ ही एक अशी निरपेक्ष वेबसाईट आहे जिथे प्रत्येक सुदृढ व्यक्तीने नाव नोंदविले पाहिजे. ही वेबसाईट तुम्हाला तुमच्या घराच्या किंवा कार्यालयाच्या जवळ रक्त देण्याची सोय उपलब्ध करून देते.
अर्थात आंतरजालावर शोधले तर इतरही अश्या प्रकारचे काम करणार्‍या वेबसाईट मिळतीलच.
पूर्वी म्हणायचे,
अन्नदानं महादानं विद्यादानं अत: परम् ।
मी म्हणेन,
रक्तदानं परमोच्चदानं नेत्रदानं च सर्वोच्चेति ।

श्वानराजाधिराज


लातूर जिल्ह्यात म्हाळुंगी येथे अस्सल भारतीय वाणाची ही कुत्र्याची जात विकसित करण्यात आली आहे. त्यांना पश्मीना हे नाव देण्यात आले आहे. हे कुत्रे अतिशय लढवय्ये असून त्यांची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा उत्तम आहे. मात्र ते महाग आहेत.
पण मूळ कुत्रे ज्यांचा संकर करून ही जात निर्माण केली गेली ते धनगर कुत्र्यांमधून शोधून काढण्यात आले होते. मूळातच धनगरांसोबत असलेले कुत्रे लढाऊ, तीक्ष्ण कानाचे, भेदक नजरेचे आणि धैर्यशाली असतात. ते प्रसंगी एकटे वाघावर पण चालून जातात.
मी परळच्या बैलघोडा रुग्णालयात कुत्र्यांवरच्या एका कार्यशाळेला गेले होते. तिथे असे ऐकले की हे धनगर लोक कुत्रे नखे तपासून, कानाचा आकार वैगरे पाहून कुत्रा निवडतात. एकदा पिल्लू पाळायचे ठरवले की एक मोठ्ठा खड्डा खणतात (हौदासारखा). त्यात त्या पिल्लाला ठेवतात आणि दिवसातून फक्त दोन- तीनदाच त्या कुत्र्याजवळ अन्न-पाणी ठेवायला आणि घाण साफ करायला त्याच्या जवळ जातात.
आता हे जे पिल्लु असते ते खड्ड्यात कंटाळते आणि कान देऊन मालक कधी येतोय त्याची वाट पाहाते. त्यामुळे जरा खुट्ट झाले की हे पिल्लू कान टवकारते. दुसरे म्हणजे, एकटेपणाची सवय होऊन ते आपोआपच माणूसघाणे बनते. तिसरे आणि महत्वाचे म्हणजे धनगरांच्या कळपात इतर कुत्र्यांबरोबर / माणसांसोबत राहून सुद्धा हा कुत्रा अन्नदात्याशी प्रामाणिक राहतो.

बुद्धिमत्ता

आपल्याकडे बरेच जणांना वाटते की एकतर आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे किंवा इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे ज्याचा त्या मुलाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. उदा. आपल्याला आपले मूल अतिशय बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्या मुलाने डॉक्टर अथवा काँप्युटर इंजिनीयर व्हावे म्हणून प्रयत्न करतो आणि जर आपल्याला आपले मूल इतरांच्या तुलनेत कमी बुद्धिमान आहे असे वाटत असेल तर आपण त्याच्यावर अभ्यासाचे अवाजवी दडपण आणतो, त्याला वेगवेगळी टॉनिके पाजतो. थोडक्यात सांगायचे तर दोन्ही प्रकारात आपण त्या मुलाचा जीव नकोसा करून सोडतो.
पण आधुनिक शिक्षणशास्त्र म्हणते की सर्व मुले सारखीच बुद्धिमान आहेत. किंबहूना समान बुद्धिमत्ता सूत्र हाच आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया आहे.
मुलांच्या बुद्धिमत्तेला ओळखा.
थोर शिक्षण मानसशास्त्रज्ञ हॉवेल गार्डनरच्या मते मुलांच्यात एकूण आठ प्रकारची बुद्धिमत्ता असते आणि प्रत्येक पालकाने / शिक्षकाने मुलाच्यातील विविक्षित बुद्धिमत्ता ओळखून त्याला योग्य ते प्रोत्साहन दिले पाहिजे.
१) भाषिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले लेखन, वाचन, कथाकथन, कोडी सोडवणे ह्याचा आनंद लुटतात.
२) तार्किक-गणिती = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले नमुने, प्रतवार्‍या, परस्पर संबंध, गणिती समस्या, व्युहरचनात्मक खेळ आणि विविध प्रयोग ह्यात रमतात.
३) शारीरिक हालचाल = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले शारीरिक संवेदनांनी ज्ञान ग्रहण करतात. ही मुले नृत्य, खेळ, विणकाम, भरतकाम, रांगोळी, हस्तकला, काष्ठकाम, शिल्पकला इ. प्रकारात रमतात.
४) अवकाशीय = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले जिगसॉ पझल, भुलभुलैय्या, लेगो खेळ (मेकॅनो), रेखाटणे किंवा दिवास्वप्नांत रमतात.
५) सांगीतिक = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले सतत ताल धरतात, गुणगुणतात. त्यांना इतरांना न ऐकू येणारे नाद आपल्या आजूबाजूच्या वातावरणात ऐकू येत असतात उदा. पाणी ठिबकणे, पाखरांचे कूजन. ही मुले उत्तम श्रोता असतात.
६) अंतर व्यक्तिगत = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले जन्मजात नेते असतात. त्यांच्याकडे उत्तम संवादकौशल्य असते, ते दुसर्‍यांचे अंतस्थ हेतू, भावना जाणतात. बरेचदा ही मुले दुसर्‍यांचे गुणदोष ओळखून त्यांच्यावर वर्चस्व गाजवतात.
७) स्वाधीन व्यक्तिगत = ह्या प्रकारची बुद्धिमत्ता असलेली मुले बरेचदा लाजाळू असतात. पण त्यांना स्वत:च्या भावनांची, मर्यादांची / वकूबाची जाणीव असते. ही मुले स्व-प्रेरित असतात.
जाता जाता : जिज्ञासूंनी ह्या विषयावरील अधिक माहितीसाठी इथे भेट द्यावी.

अनोखे वंशवृक्ष

कर्नाटकातल्या हुलिकल गावातील एक दलित जोडपं, तिमक्का आणि तिचा नवरा बिक्कालु चिकैय्या. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मूल होईना. एव्हाना शेजारी पाजारी आणि सग्यासोयर्‍यांनी तिमक्काला 'वांझ' म्हणून दूषणं द्यायला सुरुवात केली होती. एकाकीपणाची भावना घेरू लागलेल्या या जोडप्याने मग अखेर निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा.
मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या दोन्ही बाजूला काट्याकुट्या रोवून तिमक्काने जीवापाड जपलेल्या रोपट्यांचे आता डेरेदार वटवृक्ष झाले आहेत. बाजारात सुमारे ८५ कोटी रुपये इतकी किंमत असलेले हे वृक्ष वनविभागाने नुकतेच आपल्या ताब्यात घेतले. त्या बाजारभावाचा विचार कधी न तिमक्काच्या मनाला शिवला, न आज हयात नसलेल्या बिक्कालुच्या.
तिमक्काला नुकताच पंतप्रधानांच्या हस्ते सामाजिक वनीकरणासाठीचा राष्ट्रीय नागरिक पुरस्कार देण्यात आला. कुणाही कृतार्थ आईने म्हणावं तशी तिमक्का त्यावेळी म्हणाली, "त्यांना मोठ्ठं होताना पाहणं ह्यातच माझे सुख आहे".
- मटा १९९५

रंगभेदी भारतीय

गेल्या आठवड्यात माझ्याकडे एक बेल्जिअन आला होता. त्याला मुंबईतील भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, परळ बैल-घोडा रुग्णालय, माझी शाळा, नवीन वांद्रे वरळी सेतू इ. ठिकाणे दाखवली. हा वांद्रे वरळी सेतू दाखवताना मी थोडे फाटकाच्या आत गेले तेव्हा तिथल्या दरवानाने इथे सामान्यजनांना आत यायला परवानगी नाही असे म्हटले. त्यावर मी त्यांना माझ्याबरोबर असलेल्या पाहुण्यांना ह्या सेतू विषयी जाणून घ्यायचे आहे असे म्हटले.
त्यावर लगेच त्याने आम्हाला घालायला हेल्मेट्स दिली आणि पुढे जाऊन तो पूल पहायला दिला आणि त्या विषयी सविस्तर माहिती सुद्धा दिली. तो पूल पहायला दिला आणि त्याविषयी सविस्तर माहिती सुद्धा दिली.
मनांत विचार आला की हा माणूस गोऱ्या कातडीचा युरोपीयन होता म्हणून कदाचित आमचे दिलखुलास आदरातिथ्य झाले, हेच जर का त्याच्याजागी माझी अमेरिकन कृष्णवर्णीय मैत्रिण शेली असती तर झाले असते का?
आजही आपण कृष्णवर्णीय अमेरिकन, आफ्रिकन आणि आशियायी पर्यटकांची दखल तरी घेतो का? ज्या उत्साहाने आपण श्वेतवर्णीय अमेरिकन, युरोपीयन,रशियन अगदी नेमके बोलायचे तर उझबेकी, कझाकी पर्यटकांचे सुद्धा आगत स्वागत करतो त्याच्या निम्म्याने तरी आपण ह्या कृष्णवर्णीय अमेरिकन, आफ्रिकन आणि आशियायी पर्यटकांना एक व्यक्ती म्हणून किंमत देतो का?
मुक्ता चित्रपटात एक प्रसंग आहे. मुक्ताचा अमेरिकन मित्र येणार म्हणून कणसे पाटील मंडळी अतिशय खुश असतात आणि जेव्हा तो प्रत्यक्ष येतो तेव्हा त्याचा कृष्णवर्ण पाहून अनेकांचे चेहरे उतरतात, एव्हढेच नव्हे तर त्याच्या विषयी कुत्सित बोलले पण जाते.
असे असताना आपण भारतीयांना रंगभेद, वर्णभेद ह्या विषयी बोलायचा नैतिक अधिकार उरला आहे का? आपल्याला काय वाटते?

दुध-दुभते (भाग १)


मा. शिरीष पै यांनी एके ठिकाणी लिहिले आहे की त्या रोज भल्या पहाटे दुध, दही, ताक इ. ची भांडी काढतात. वातावरण प्रसन्न असते. पाखरांचा किलबिलाट चालू असतो. त्या दुधाला दही लावतात. आधी लावलेल्या दह्याचे लोणी करायला घेतात. शांत वातावरणात केवळ रवी घुसळण्याचा आवाज घुमत राहतो.
त्यांना असे वाटते की जणू आपण त्या समयी गोकुळात आहोत आणि यशोदे मातेसारखे कृष्ण बाळासाठी हे दुध-दुभते करत आहोत. त्यांच्या अनेक नातेवाईक बायका त्यांच्या ह्या वेडेपणाला हसतात. पण त्या म्हणतात की मला हे दुध-दुभते करताना एक वेगळाच, छानसा आनंद मिळतो.
हाच आनंद तुम्ही पण अनुभवू शकता….
विरजण
दुधाचे दही करण्याचा प्रक्रियेला विरजण लावणे असे म्हणतात. प्रथम दुध उकळवावे (दहीजास्त घट्ट हवे असल्यास मंद विस्तव करून थोडेसे आटवावे). दुधाला उकळी आल्यावर ते थोडे निवू द्यावे (उन्हाळ्यात कोमट दुधाला विरजण लावावे तर हिवाळ्यात जरा उष्ण दुधाला विरजण लावावे).
त्यानंतर हे दुध २-३ वेळा २ भांड्यात चांगला फेस येईपर्यंत वर खाली करावे (दाक्षिणात्यलोक कॉफी दोन भांड्यात खाली वर करतात तशी). त्यामुळे दुधात ऑक्सीजन चांगला मिसळला जातो (ऑक्सीडायझेशन).
नंतर ज्या भांड्यात दही लावायचे त्यात थोडेसे चांगले दही घेऊन नीट फेटावे. चांगले दही अशा करीता कारण "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी". विरजणासाठीचे दही चांगले असेल तर आणि तरच नव्याने होणारे दही चांगले होऊ शकते.
तसेच ही दही लावण्याची भांडी शक्यतो मातीची, चिनी मातीची (पोर्सेलीन) आणि नाईलाज झाला तरच स्टीलची असावीत. दही हे आम्लधर्मीय असल्याने लोखंड, अल्युमिनीयम, हिंडालियम, जर्मेनीयमच्या भांड्यात लावू नये.
मातीची भांडी सगळ्यात चांगली कारण ती दही बनल्यावर त्यातील अतिरिक्त पाणी शोषून घेतात आणि आपल्याला घट्ट दही मिळते.
विरजण लावण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या थोड्याश्या दह्याचे काहीही प्रमाण ठरलेले नाही. कारण ही सर्व प्रमाणे सतत प्रयोग करीत राहिल्याने अनुभवाने कळायला लागतात (ट्रायल अँड एरर).
आता त्या फेटलेल्या दह्यावर जरासे वरूनच निवलेले दुध ओतावे आणि ते विरजणाचे भांडे कोपऱ्यात जिथे कोणाचाही सहसा हात लागणार नाही अश्या ठिकाणी ठेवावे व त्या विरजणाचा भांड्यावर अलगद अर्धवट झाकण (शक्यतो ताटली) घालावे. साधारण पाऊण एक तासाने ते झाकण पूर्ण पणे लावावे.
झाकण लावताना भांड डुचमळू देऊ नये. साधारण ८-१० तासांनी त्या भांड्याचे झाकण काढावे व दही लागले आहे असे वाटले तर त्या भांड्याची कडा एका बाजूने किंचित उचलावी. जर दही अजिबात हलले नाही तर ते चांगले लागले आहे असे समजावे. दही एकसंघ असेल मात्र कडेला पाणी दिसले तर ते अजून एक तासभर तसेच ठेवावे.
मात्र जर कड उचलल्यावर दही द्रवरुपात दिसले तर एका मोठ्या भांड्यात थोडे पाणी गरम करून त्यात ते दह्याचे भांडे अलगद ठेवावे. काही तासांनी दही लागलेले दिसते (हिवाळ्यात बरेचदा असे घडते).
महत्त्वाचे म्हणजे एक प्रयोग फसला तर दु:ख मानून घेऊ नये. अनुभवाने सर्व नीट जमायला लागते.
वि. सू. : दही लावताना इतर वापरासाठीचे दुध दही, दही लावण्याची भांडी ह्यापासून कमीत कमी ३ मीटर वर ठेवावे. शीत यंत्रात सुद्धा दुध दह्याची भांडी जवळ जवळ ठेऊ नयेत. दही लावायला घेण्यापूर्वी हात तसेच दही लावायची भांडे स्वच्छ धुवावीत.
(क्रमश:)