Wednesday 30 January 2013

शिवराजाभिषेक

काल रायगडी अप्पांसोबत सर्वांच्या बऱ्याच गप्पा झाल्या. त्यात अप्पांनी निःसंदिग्ध पणे काही बाबी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी कधीही शिवराजाभिषेकाला विरोध केला नव्हता. गागाभट्टांचे सहाय घेण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राजाभिषेकाचा विधी माहित नव्हता. अर्थात् ते सहाजिकच आहे, शिवाजी राजांच्या उदयापूर्वी भारत शतकानुशतके परतंत्रात होता, त्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या अनेकानेक पिढ्यांमध्ये कोणीही राजाभिषेक केलेला नव्हता. ज्या प्रावीण्याचा उपयोग नसतो ती प्रावीण्ये एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे पोहोचत नाहीत. कालौघात ते ज्ञान नष्ट होत जाते. उदा. मराठेशाहीत आपल्या सर्वांच्या पूर्वजांनी तलवारी गाजवल्या पण आपल्या पिढीला तलवारीचे दोन हात सुद्धा करता येणार नाहीत. त्यासाठी ती परंपरा जपणाऱ्या काही तज्ज्ञांनाच बोलवून आणावे लागेल. असो. सांगायची गोष्ट इतकीच की शिवराजांच्या अभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला हा प्रचार खोडसाळ आहे. कारण असा काही विरोध ब्राह्मण, मराठी क्षत्रिय वा अन्य कोणाकडूनही झाला असता तरी महाराजांनी तो सपशेल मोडून काढला असता. ब्राह्मण म्हणूनही कोणाची तमा बाळगण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कारण शिवाजी राजांच्या मनात जातीभेदाला स्थान नव्हते. उदा. दि. १८ जानेवारी १६७५ ला एका पत्रात शिवाजी राजे प्रभावळीचे सुभेदार जिवाजी विनायक ह्यांना कामात कसूर केली म्हणून एक ताकीद पत्र लिहितात. त्यात ते लिहितात - 'ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करूं पाहतो? आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहात ते करणे याउपरी बोभाट आलियाउपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम जालेस, ऐसे जाणोन बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे, रवाना.' असे असताना बी' ग्रेडींच्या पिवळ्या पुस्तकांवर किती विश्वास ठेवावा हे ज्याने त्याने स्वतःचे स्वतः ठरवावे. -------------------------------------------------------------------------- राजाभिषेक प्रसंगी वेदशास्त्रसंपन्न गागाभट्ट ह्यांच्या मार्गदर्शनाविषयी पुन्हा कधीतरी सविस्तर लिहिनच. तो विषय इथे लिहायला घेतला तर लेखाची लांबी प्रचंड वाढेल. संदर्भग्रंथ - वेध महामानवाचा - ले. डॉ. श्रीनिवास सामंत.