Friday 20 August 2010

कोबीची वेगळी भाजी


जिन्नस

* साखर,
* मीठ,
* ओले खोबरे,
* फोडणी साहित्य,
* अर्धा किलो कोबी,
* आले

मार्गदर्शन

अर्धा किलो कोबीच्या सळप्या (फ्राईड राईसमध्ये घालतो तसे उभे लांबट तुकडे) काढाव्यात.


फोडणी - मंद आचेवर कढईत अर्धी वाटी तेलात प्रथम मोहरी तडतडवावी. तडतडण्याचा आवाज
थांबलाकी लगेच उडिद डाळ घालावी. ती लालसर झाली की त्यात ४-५ पाने कढीलिंब, एक कमी
तिखट मिरचीमध्यात चिरून, अर्धा चमचा जिरे, हळद थोड्या थोड्या वेळाने घालावे.

मग चिरलेला कोबी घालून उलथण्याने हे मिश्रण नीट सारखे करावे. मग अर्धा इंच आले नीट
ठेचूनत्यात घालावे. सोबत चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर घालावी. ५ मिनिटे कढईला पूर्ण
झाकेलअसे झाकण घालून मंद आचेवर ही भाजी शिजू द्यावी. मग झाकण काढल्यावर कोबीला
पाणीसुटलेले दिसेल. मग उलथण्याने भाजी पुन्हा पुन्हा खालीवर करावी आणि कोबी पारदर्शक
दिसलाकी विस्तव बंद करून त्यावर ओले खोबरे पेरावे.

आता भाजी खायला घ्यावी.

टीपा
कोबी अर्ध कच्चा शिजवावा. तो जास्त शिजला तर भाजी छान लागत नाही. मिरच्या २ पण
घातल्या तरी चालतात पण आल्यामुळे भाजी जास्त तिखट व्हायची पण शक्यता असते.

भाजी झाली की ती कढईच्या बाजूंना थोडी वर चढवून ठेवावी. फोडणीचे तेल कढईच्या खोलगट
भागातजमा होते. ही बिनतेलाची भाजी वरच्या वरती काढून घ्यावी व निथळून आलेल्या तेलात
जाड पोहे घालावेत. हे जाड पोहे भाजून, साखर, मीठ, फरसाण, खोबरे घालून खावे.

हीच भाजी पुरीच्या सारणात भरून कोबीच्या करंज्या पण करता येतात. ह्या भाजीत वाटाणे घालणे
ऐच्छिक आहे.

माहितीचा स्रोत
घर

Original post : कोबीची वेगळी भाजी

खाद्यविवेक

माझ्या एका मावशीला वाटते की तिने अभिमन्युप्रमाणे गर्भावस्थेतच वैद्यकशास्राचे ज्ञान घेतलेले आहे. वेगवेगळी वैद्यकशास्राची पुस्तके वाचणे आणि सतत आहार बदल आणि निरनिराळी औषधे घेणे तसेच लोकांना मोफत वैद्यकीय सल्ले देणे ह्या गोष्टी ती इमाने इतबारे करीत असते. काही वर्षापूर्वी तिला किरकोळ सांधेदुखी चालू झाली. ती बरी होईना. शेवटी तिने नाईलाजाने एका वैद्यांचा सल्ला घ्यायचे ठरवले.

वैद्यांकडे गेल्यावर तिने तिची अद्भूत वैद्यकज्ञानाची पोतडी उघडली. वैद्यांनी शांतपणे तिचे सर्व प्रवचन ऐकून घेतले आणि मृदू आवाजात विचारले, तुम्ही तेल आणि तुप किती खाता?

त्यावर तिने आपण पाण्यात कशी कणीक भिजवतो आणि भाज्या कश्या बिनतेलाच्या करतो हे अभिमानाने सांगितले. तुप खाणे तर तिने केव्हाच सोडून दिले होते. त्यावर त्या वैद्यांनी तिला एकच सल्ला दिला. चौरस आहाराचा भाग म्हणून तेल, तूप खात जा आणि जे सांधे दुखतात त्याना हळुवारपणे तीळाचे तेल चोळत जा. काही महिन्यातच तिची सांधेदुखी थांबली. तेल, तुप ह्या इंधनांनी आपले काम चोख बजावले होते. ही सत्यघटना आहे.

त्यानंतर तिने कणीक भिजवताना गोडे तेल, तीळाचे तेल, एरंडेल, सूर्यफुलाचे तेल, मेथीचे तेल एकत्र घालायला सुरवात केली.

आज बऱ्याच वर्षांनी ही गोष्ट आठवायचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात आमचे कुटुंब वैद्य श्री. शेंडे मला सहज म्हणाले, तेलकट खा, तुपकट खा पण तळकट खाऊ नकोस.

त्यांच्या म्हणण्यानुसार पोळी, भाजी, आमटी ह्यात आवश्यक तेव्हढे तेल, तूप नक्की खावे. तसेच चटणीबरोबर कच्चे तेल घेण्याची पद्धत आहे ती पण योग्यच आहे. मात्र तळकट पदार्थ उदा. वडे, भजी इ. जमेल तितके टाळावेत. कारण वडे, भजी वैगरे करताना एकच तेल वारंवार तापवतात, त्याला धूर येतो.

घराबाहेर उपाहारगृह, फेरीवाले यांच्याकडे खाताना सुद्धा शक्यतो मिसळ, पाणीपुरी, भेळपुरी, टोस्टेड सँडविच इ. इ. खावे. याला अनेक कारणे आहेत. १) मुगाच्या पाणीपुरीत मोड आलेले कडधान्य, पुदिना, सैधव मीठ, कोथिंबीर इ. असते. पांढऱ्या वाटाण्याच्या पाणीपुरीपेक्षा मुगाची पाणीपुरी मागवावी. २) मिसळीत तर अनेक मोड आलेली कडधान्ये असतात. ३) साध्या सँडविचपेक्षा टोस्टेड सँडविच चांगले तरी शक्यतो पाव टाळलेलाच बरा. ४) ऐकिव माहिती अशी आहे की अनेक महागडे फरसाणवाले आपले फरसाण एका तेलातून काढतात आणि नंतर ते तेल वडेवाले विकत घेतात. ५) अनेकदा गरम केलेले तेल शरीराला घातक.

माझ्या ओळखीतील एकजण महिन्यातून एकदा रत्नागिरीहून मुंबईला येतात. येताना रत्नागिरी रेलस्थानकावरील एका ठेल्यावर पाव, बटर विकत घेतात आणि ओळखीमुळे तो ठेलावाला त्यांना वड्याची चटणी मोफत देतो. मग हे प्रवासात बटर, चटणी, पाव खातात आणि जोडीला कोकण रेल्वेतील चविष्ट टॉमॅटो सूप पितात.

ह्याचा अर्थ वडे, भजी खाऊच नयेत असे नाही पण प्रमाण कमी करावे किंवा हे पदार्थ घरी करून खावेत. कारण वडे, भजींचा जो मोह टाळतो त्याला जितेंद्रियच म्हणावे लागेल. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचे ते कामच नव्हे.

पण निदान पावसाळ्यात तरी बाहेरचे वडे आणि भजी ह्यांचे प्रमाण कमी करणे सहज शक्य आहे. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे भजी घरी करून खावीत म्हणजे वांग्याची, पालकाची, पनीरची, शिराळ्याची, दुधीची, चुक्याची आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे शिळ्या, उरलेल्या भाजीची भजी असे त्यात वैविध्य आणता येते.

बाहेर मिळणार आहेत का अशी छान छान भजी?

Original post: खाद्यविवेक

अनोखे वंशवृक्ष

कर्नाटकातल्या हुलिकल गावातील एक दलित जोडपं, तिमक्का आणि तिचा नवरा बिक्कालु चिकैय्या. लग्नाला बरीच वर्ष झाली तरी त्यांना मूल होईना. एव्हाना शेजारी पाजारी आणि सग्यासोयर्‍यांनी तिमक्काला 'वांझ' म्हणून दूषणं द्यायला सुरुवात केली होती. एकाकीपणाची भावना घेरू लागलेल्या या जोडप्याने मग अखेर निर्णय घेतला मूल दत्तक घ्यायचा.

मूल दत्तक घेण्यात काय एव्हढं विशेष. विशेष होते कारण तिमक्काने पालनपोषण करून मोठ्ठं करण्यासाठी निवडली ३०० वडाची रोपटी. १९५० च्या आसपास ह्या जोडप्याने लावलेल्या त्या रोपट्यांनी आता चांगलाच आकार घेतला आहे. कर्णाटकातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या दोन्ही बाजूला काट्याकुट्या रोवून तिमक्काने जीवापाड जपलेल्या रोपट्यांचे आता डेरेदार वटवृक्ष झाले आहेत. बाजारात सुमारे ८५ कोटी रुपये इतकी किंमत असलेले हे वृक्ष वनविभागाने नुकतेच आपल्या ताब्यात घेतले. त्या बाजारभावाचा विचार कधी न तिमक्काच्या मनाला शिवला, न आज हयात नसलेल्या बिक्कालुच्या.


तिमक्काला नुकताच पंतप्रधानांच्या हस्ते सामाजिक वनीकरणासाठीचा राष्ट्रीय नागरिक पुरस्कार देण्यात आला. कुणाही कृतार्थ आईने म्हणावं तशी तिमक्का त्यावेळी म्हणाली, "त्यांना मोठ्ठं होताना पाहणं ह्यातच माझे सुख आहे".

- मटा १९९५

Original post : अनोखे वंशवृक्ष

देसी अभियांत्रिकी

१) माझ्या सीपीयू मध्ये जर चुकून सीडी ठेवायची विसरले आणि सीडी प्लेयरचा खाचा (स्लॉट) रिकामा राहिला तर तो इजेक्ट बटन दाबला तरी बाहेर येत नाही. तो सहज बाहेर यावा ह्यासाठी माझ्या हार्डवेयर अभियंत्याने अगदी सोपी युक्ती सांगितली आहे. प्रत्येक सीडी ड्राईव्हवर इजेक्ट बटनाशेजारी एक उघडझाप करणारा छोटा दिवा असतो. त्या दिव्याच्यावर एक बारीक भोक असते. त्या बारीक भोकात सहज जाईल अशी पण टाचणीपेक्षा जरा जाड तार घालायची आणि तिच्या टोकाला किंचित दाब द्यायचा आणि त्याच वेळी इजेक्ट बटन दाबत राहायचे. ती तार हळू हळू आत जाते आणि सीडी खाचा बाहेर येतो.

२)आमच्या इथे एक दुग्धशाळा आहे. तिथे विशाल औद्योगिक शीतयंत्रे आहेत. त्या शीतयंत्रात पाणी भरतात आणि त्या पाण्यात मोठे दुधाचे कॅन ठेवतात. सतत हे वजनी कॅन ठेवत राहिल्याने त्या शीतयंत्राच्या पत्र्याला तळाला बारीक छिद्रे पडतात आणि त्यातून पाणी झिरपते. त्यावर तिथल्या गवळ्यांनी एक सोपा उपाय काढला आहे आणि तो म्हणजे जास्ती चिकटपणा असलेल्या मातीची वस्त्रगाळ पूड करायची आणि ती वस्त्रगाळ पूड हलक्या हाताने त्या पाण्यात सोडायची. मग ती वस्त्रगाळ पूड सावकाश तळाला जाते आणि त्या छिद्रांमध्ये जाऊन घट्ट बसते आणि ती छिद्रे कायमची बुजतात.

असे हे देसी अभियांत्रिकी (Engineering), केवळ आपल्या पैशाचीच बचत करते असे नाही तर वस्तुंच्या पुनर्वापरामुळे आणि टिकाऊपणामुळे पर्यावरणाचे पण संरक्षण करते. कारण एकदा वापरा आणि फेकून द्या (Use & Throw) ह्या विकृतीमुळे पर्यावरण ढासळत चालले आहे.

Original post : देसी अभियांत्रिकी

दही बटर

जिन्नस

* साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे भुकटी, चाट मसाला
* बटर
* दही

मार्गदर्शन

घट्ट दही प्रथम थोडेसे पाणी घालून नीट घुसळून घ्यावे. त्यात रुचीप्रमाणे साखर, मीठ, लाल तिखट चूर्ण, भाजलेले जिरे-धणे यांची भुकटी, चाट मसाला घालावे. पुन्हा थोडे एकजीव करावे.


मग कोमटपेक्षा थोडे गरम पाणी करावे, वाडग्यात घ्यावे आणि बटर (खारी बिस्किट कुटुंबातले) एकावेळी २-३ त्या कोमट पाण्यात तळाकडच्या बाजूला बुडवावेत. तो भाग किंचित मऊ झाला असे वाटले की बटर पालथे करून शिखराचा भागसुद्धा मऊ करून घ्यावा.
दोन्ही भाग पुरेसे मऊ झाले वाटले की एक एक बटर दोन हातांच्या तळव्यात चेपून दह्यात घालावा. मराठमोळे दहीवडे तयार. सर्व साहित्य असेल तर हा पदार्थ सातव्या मिनिटाला तयार.
टीपा
१) बटर शक्यतो मध्यम आकाराचे चांगल्या प्रतिचे असावेत (जिरे बटर). २) पाणी जास्त गरम असले तर हात भाजतो आणि कमी गरम असेल तर ४-५ बटर मऊ होईपर्यंत थंड होते. ३) पहिला प्रयत्न मनाजोगा झाला नाही तर नाउमेद होऊ नये. २ ऱ्या -३ ऱ्या वेळेपासून सर्व नीट जमून येते. ४) लहान मुलांना आवडते. पण बरेचदा करू नये कारण बटर मैद्यापासून बनविलेले असतात. मजा म्हणून महिन्यातून १-२ वेळा हरकत नाही. ५) पाहुण्यांना देताना थोडी बुंदी, लाल डाळिंबदाणे पेरून द्यावेत. ६) बटर फार वेळ पाण्यात किंवा दह्यात ठेऊ नयेत. लगेच पोटात टाकावेत नाही तर ते पाणी शोषून घेतात आणि फुगून पानचट लागतात.
माहितीचा स्रोत
घर

Original post : दही बटर

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ६)

विष्णुपंतांचे शब्द प्रांताच्या पाठीत बुक्क्या बसल्याप्रमाणे बसून तो नरमून म्हणाला, "मग आम्ही काय करावे म्हणता?"


"तुम्ही सरकार आहात." पंत ठासून म्हणाले, "हा दुष्काळ निवारा. साथीचा बंदोबस्त करा आणि लोकांना दुष्काळाच्या दाढेतून बाहेर काढा."


विष्णुपंत बोलत होते, लोक ऐकत होते, प्रांत ऐकत होता. सर्वत्र शांतता निर्माण झाली. पंत क्षणभर थांबले. प्रांत काहीच बोलेना.


तो निरुत्तर झाल्याचे लक्षात येताच पंतानी बजावले, "साहेब, हे लोक मढी नाहीत. जो बैल चुचकारून चालत नाही त्याला पराणी टोचून पळायला लावणारे हे लोक आहेत. तलवार त्यांच्यावर काबू करू शकत नाही."


एकाएकी प्रांत चटकन् उठला. त्याच्या रागीट चेहर्‍यावर हास्य तळपले. त्याने पंतांचा हात हातात धरून म्हटले, "आम्ही तुमचे वय आणि दर्जा लक्षात घेतले नाही म्हणून राग मानू नका. आम्ही दुष्काळ निवारण्याची शिकस्त करू."


विष्णुपंत शांत झाले. त्यांनी मुरावर नजर फेकली. मुराच्या सुटकेचा हुकुम प्रांतसाहेबांच्या मुखातून पोलिसांच्या कानात शिरला. मुराची बेडी निखळली. लोकांनी नि:श्वास टाकला. सर्व नजरा पंतांवर स्थिर झाल्या.


तो काळ गेला, तो दुष्काळ गेला, ते विष्णुपंतही गेले. पण विष्णुपंतांचे शब्द अजूनही लोक विसरले नाहीत. कोणीही विसरू नयेत इतके खोल माणसांच्या हृदयांत ते घर करून बसले आहेत. कधी कधी ते कानात गुणगुणू लागतात

- "तुम्ही जगलंच पाहिजे!".


(समाप्त)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ६)

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ५)

हातापायांची आग झाल्याप्रमाणे पंत चुळबुळ करत सभोवार पाहू लागले आणि प्रांत गोंधळून म्हणाला, "पंत तुम्हाला म्हणायचंय काय?"


"मग ऐका तर" पंत निर्भीडपणे खणखणीत आवाजात बोलू लागले, "साहेब, माझा गाव दुष्काळाच्या छायेत असून लोक कुरडूचा पाला खात आहेत आणि साथीच्या रोगाने घरे बसत आहेत हे सर्व मी तुम्हाला कळविले होते की नाही?"


पंतांच्या सरबत्तीने प्रांत चमकला. तो मटकन् खुर्चीवर बसला. "खरं आहे" तो पुटपुटला.


"मग उत्तर का दिले नाही?" पंत वेड्यासारखे ओरडले.


"उत्तर दिले नाही म्हणून लोकांनी अराजकता माजवावी, लुटालुट करावी हे आम्हाला मान्य नाही" प्रांत खेकसला.


पंत भाला भोसकल्याप्रमाणे बिथरून ओरडले, "मग काय मान्य आहे? लोकांनी कुत्र्याच्या मौतीने मरावे? साहेब, मलाही हे मान्य नाही."


"मग काय मान्य आहे?" प्रांत किंचाळला, "लुटालुट आणि बेबंदशाही?" त्याने चावडी डोक्यावर घेतली.


"ह्याला उत्तर होय!" पंत गंभीरपणे उद्गारले.


"ठीक आहे, करा लुटालुट, आम्ही आरोपींना घेऊन आताच सातार्‍याला जातो" प्रांत डोळे बारीक करून म्हणाला.


त्यावर पंत निर्भयपणे म्हणाले, "जा, खुशाल जा. पण लवकर परत या."


"का, कशाला?" प्रांत चमकून म्हणाला.


"मला, - विष्णुपंताला अटक करायला" पंतांनी उग्र आवाजात तंबी दिली.


"म्हणजे तुम्ही स्वत: लुटालुट करणार तर?" प्रांताने विचारले.


पंतांनी उपरण्याने कंबर बांधली. प्रांतावर करडी नजर रोखली आणि मान उंचावून उत्तर दिले, "साहेब, जर दुष्काळाचा आणि साथीचा बंदोबस्त झाला नाही तर प्रत्येक माणसाला एक तर कुत्र्याच्या मौतीने मरावे लागेल किंवा लुटारू होऊन काही दिवस जगावे लागेल आणि मी कुत्र्या सारखा मरणारा माणूस नाही साहेब!"


(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ५)

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ४)

मुराचे पुष्कळ लोक धान्याची पोती घेऊन दूर गेले होते आणि निवडक लोकांनिशी मुरा त्या वेढ्यात अडकून पडला होता. गावकर्‍यांनी पांद रोखल्याचे लक्षात येताच बळी धावत येऊन म्हणाला, "मुरा, गावकर्‍यांनी पांद आडवली, आता?" क्षणभर विचार करून मुरा म्हणाला,"दावण कापून सारी गुरं पांदीत घाला आणि मागनं गोफणीने जोडून वाट काढीत चला."

बळीने दावण कापली. सर्व गुरे पांदीत लोटून मागे दंगल उडवून दिली. वर शेपट्या करून गुरे पांदीने पळू लागताच त्या भयंकर दंगलीने गावकर्‍यांची भंबेरी उडाली. त्यांनी पळ काढला. गुरांचा गळा मोकळा करून मुराने स्वत:चा गळा सोडवून घेतला.

पहाट झाली होती. उषा हर्षभरित होऊन वर येत होती. कितीतरी दिवसानी आनंद त्या निवडुंगात परत आला होता. मशालीच्या प्रकाशात मुराच्या दारात दाणे वाटण्याचे काम चालू होते. पाट्या, बुट्ट्या, शिवडी घेतलेले लोक रांगेने बसले होते. त्यांच्या भकास चेहर्‍यांवर आनंदाच्या छटा उमटल्या होत्या. धान्याचा ढीग पाहूनच त्यांची तहानभूक हरपली होती. मोडून पडलेल्या मानवाला अन्नातील किमया हसवीत होती.

धान्य वाटून झाले. एक लहानसा ढीग शिल्लक राहिला. तो मापाने मोजता येण्यासारखा नव्हता. तेव्हा बळीने मुराला विचारले, " दाणं कसं मोजावं?" त्यावर मुरा विचार करून म्हणाला, "डाव घेऊन डावीने बराबर वाटा, एक दाणा एका माणसाला एक दिवस जगवील हे विसरू नका."

सूर्योदयाच्या आत वाटण्या झाल्या. कित्येक दिवसांची निश्चल जाती घरघरली, थंड चुलींना उबारा आला, तव्यांना झळा लागल्या. घराघरावर धूर घोटाळत फिरू लागला आणि सूर्याच्या कोवळ्या किरणांत दारात बसून पोरे ऊन ऊन भाकरी खाऊ लागली.


तिसर्‍या दिवशी चावडी पुढे बुच्याड लागले. सातार्‍याहून प्रांतसाहेब आले. कैक फौजदार धावपळ करू लागले. पोलिसांनी वेशी दाबून ठेवल्या आणि मुराला अटक झाली. चावडीपुढे तर रीघ लागली होती. त्या गर्दीत तो मालेवाडीचा मठकरी मिरवत होता.


मुराच्या अटकेची बातमी बातमी ऐकून विष्णुपंत धावतच आले. लोकांनी मागे सरून त्यांना वाट दिली; परन्तु पंत चावडीची पायरी चढले नाहीत. ते दारात उभे राहूनच बोलले, "साहेब, काय आरंभले आहे हे?"


"आम्ही गुन्हेगारांना अटक केली आहे," प्रांतसाहेब ओट्यावरून उत्तरले.


"आम्ही या गावचे सरकारी नोकर आहोत हे मान्य आहे का आपणांला?" पंतांनी सहज प्रश्न केला.


"हो खरं आहे ते." प्रांत उत्तरला.


"मग आम्हाला न विचारता ही धरपकड का?" पंतांनी गाव-कामगाराचा नियम पुढे केला. त्यांचा स्वर किंचित चढला होता.


परन्तु प्रांतसाहेब चिडक्या आवाजात उत्तरले, "तसा आम्हाला अधिकार आहे आणि यांनी तर या मालेवाडीच्या मठकर्‍यांना लुटलं आहे."


"पुरावा काय?" पंतांनी चढत्या स्वरात पुराव्याची मागणी केली आणि कमरेवर हात ठेवून प्रांतसाहेब शांतपणे म्हणाले, "मठकर्‍यांच्या धान्याचा माग या गावच्या सीमेला भिडला असून या लोकांच्या घरात भाकरी सापडली आहे."


पण विष्णुपंत खवळून गरजले, "मग मला का नाही अटक करीत? तो माग माझ्याच गावाला भिडला असून माझ्याही घरी तुम्हाला भाकरी सापडेल."

(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ४)

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ३)

उरलेले लोक आपआपल्या घरी परतले. मुराने आकाशात दृष्टी रोखून रात्रीचा अंदाज घेतला आणि तो चालू लागला.

त्याच्या मागून ते दीडशे गडी निघाले. निवडुंगात हत्यारे चमकली.

गावाबाहेर पडून मार्गाला लागल्यावर बळीने हळूच विचारले,

"मुरा कुठं जायचं?"

"मालेवाडीच्या मठकर्‍याला लुटाय." मुरा समोर पाहून उद्गारला आणि वादळाप्रमाणे धावत निघाला.

मालेवाडी शांत होती. गुडघे पोटाशी धरून खोपीत बसलेल्या माणसाप्रमाणे ती डोंगराच्या खोदर्‍यात बसली होती. रात्रीच्या रंगात एकरुप झाली होती. गावाच्या एका टोकावर मठकर्‍यांचा भव्य वाडा वाळीत टाकल्याप्रमाणे दूर बसला होता. त्याच्या चिरेबंदी भिंतीवर रात्र टकरा घेत होती.

फार पूर्वी एका उदार राजाने एका पुजार्‍याला मठाची देखरेख करण्यासाठी १४ गावची जहागिर दान केली होती. त्या दानावर मठकरी मठाचा खर्च करीत असे. आजपर्यंत मठाचा पुजारी आणि त्या दौलतीचा मालक होण्यासाठी त्या गावात भयंकर होड लागली होती.

मोठमोठी धेंडे त्या मालकीवर टपून बसली होती. एक दुसर्‍याचा खून करून स्वत: दत्तक जात होता आणि तिसरा त्याचा मुडदा पाडून आपली मालकी प्रस्थापित करीत होता. आजपर्यंत कित्येक दत्तकांनी कित्येकांना वाटे लावले होते. आजही वाड्यात पाच मालकीणी रांडपण रेटीत होत्या.

तिथे पेवांत किडे नांदावेत तशी माणसे नांदत होती. मठकर्‍याच्या चौसोपी वाड्यात प्रत्येक खांबाला एक अशा कैक धान्याच्या कणगी उभ्या होत्या. त्या साखळदंडाने जखडल्या होत्या. जागोजाग चाकर निजले होते. शिकारी कुत्री खुरमांडी घालून बसली होती. अंगणात पलंग टाकून मठकरी निजला होता. तिथे निर्भय निजणार्‍यांच्या घोरण्याने रातकिड्यांची चिरचिर बंद पाडली होती. चौदा गावचे धान्य आणि जीवन पोटात घेऊन वाड्याचा कुसव धापा टाकीत होता.

त्या दगडांना मुराचे हात भिडले. त्याच्या दीडशे लोकांनी नाकेबंदी करून पहिला आडणा मारायचे काम पुरे केले. वाड्याभोवती वादळापूर्वीची शांतता कुजबुजत होती.

एकाएकी लाकडी घाण्याप्रमाणे तो दरवाजा ओरडला. सारा वाडा हादरला आणि मशालीचा प्रकाश नि हत्यारे यांनी मठकर्‍याचे अंगण भरले. दावणीच्या गुरांनी धडपड चालू केली. कुत्र्यांनी वाडा डोक्यावर घेतला. मठकर्‍याने किंचाळून, लाथा मारून गडी जागे केले आणि बोंब ठोकली. " धावा! धावा!"

मुरा त्वेषाने पुढे जाऊन ओरडला, "बोंबलू नगं, न्हाय तर मुंडकं मारीन."

क्षणात सर्व काही पूर्ववत् झाले. उठलेले सर्व गडी पुन: पडून पाहू लागले. कुत्री भुंकत राहिली. कुर्‍हाडीचे घाव कणगीवर पडू लागले. मुक्त धान्याचा लोंढा अंगणात आला. पोती भरली जाऊन ती अंधारात पळू लागली.

मुराला समोर पाहून मठकर्‍याला हरिश्चंद्राला स्वप्नात लुटणार्‍या विश्वामित्राची आठवण झाली. त्याने पळ काढला, तो गावात जाऊन ओरडला, "वाचवा! धावा!"

उभी मालेवाडी उठली, मशाली पेटल्या, हत्यारे निघाली आणि गावकर्‍यांनी मुराच्या मुख्य वाटेची पांद रोखून धरली.

मुराभोवती वेढा पडला.

(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग ३)

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग २)

पंतांच्या मुखातून शब्दाऐवजी निखारे बाहेर पडले आणि मुराच्या अंत:करणात धैर्याचा महासागर लाटा उधळीत उठला. त्याने चटकन वाकून पंतांपुढे हात टेकला आणि उठून गंभीरपणे तो म्हणाला, "आबा, मी जातो."


"जा, उकिरड्याचा पांग फिटतो आणि तुम्ही तर माणसे आहात." पंतांनी मुराला निरोप दिला.

काजळी झडताच ज्योत प्रखर व्हावी तद्वतच मुराचे मन उजळले. त्यात आकाशाला गवसणी घालण्याची प्रबलता संचारली. त्याच्या तरुण पायांत हिंमत नाचू लागली. तो बेभान होऊन विद्युत्गतीने वाड्याकडे निघाला. चिखल तुडवावा तसा तो अंधाराला तुडवीत चालत होता.

ओसाड वातावरणाने मुराच्या गावची मोट बांधली होती. आकाश आणि धरणी यांच्यामध्ये असलेली पोकळी अंधाराने भरून काढली होती. घोंगड्याच्या घडीसारख्या काळ्या जमिनी मढ्याप्रमाणे पडल्या होत्या. त्यांच्या पाठीवरून दुष्काळ सरपटत होता. जणू क्रौर्याने सृष्टी तलवारीच्या टोकावर धरली होती आणि उत्पात आरंभला होता, त्या दुष्काळापुढे माणूस पराभूत झाला होता.

उन्मत्त दुष्काळाने पृथ्वीची शोभा नष्ट करण्यासाठी नभांगणातल्या चांदण्यासुद्धा ओरबाडून गिळल्या आहेत आणि आभाळाचे पोट फुटून अंधार खाली गळत आहे असा भास होत होता.

मोकळ्या जागेतील लिंबाखाली लहानमोठी अशी दोनशे माणसे जमून बसली होती. ती मुराची वाट पाहत होती. या निकराच्या समयी मुरा काय सांगतो ते ऐकण्यासाठी ते सर्व उत्सुक झाले होते. तोच मुरा आला. सर्वांनी गंभीर होऊन कान टवकारले. पटकुरे सावरली, नि:श्वास टाकला.


"काय म्हणलंत कुलकर्णी?" बहिरुने सुरवात केली.

"त्यांनी जगाय सांगितलंय." मुरा म्हणाला.

"पन कोरड्या बोलण्यानं जगता येत न्हाय." बळी म्हणला.


"खरं हाय त्ये." मुरा लिंबाच्या मुळीवर बसून म्हणाला. "पन कुळकर्णी आणि आपुन

एकच हाय. मातूर आमी आधी मरणार आनि कुळकर्णी थोड्या उशीराने मरनार एव्हढंच."


"मग आमास्नी धनी कोण?"


"आमीच." मुरा उद्गारला.


"म्हंजी आमी मराय पायजे" किंवडा सावळा ओरडला.


"न्हाय, जगलं पायजे !"


"विठ्ठला, पांडुरंगा, माझी दोन पोरं घडीची सोबती आहेत. त्यांनी कसं जगावं?" कोंडी हात जोडून म्हणाला."


"सार्‍यांनी जगलं पायजे." मुरा ताडकन उठून म्हणाला. तो घरी जाऊन तलवार घेऊन बाहेर आला.


"पन कसं?"


"केरु, बळी, दौलु, पांडू, सावळा, सादू आनि ज्येला माझ्याबरोबर चालता येत असंल त्येनी एका बाजूवर निघावं."


खवळलेले आग्या मोहोळ घोंगावत उठावे तद्वत दीडशे गडी एका बाजूला निघून उभा राहिला आणि मुरा पुन्हा म्हणाला,

"आमी येईपतुर तुमी मढी पानी पाजून जतन करा. उद्या इथे अन्नाचा ढीग लावतो."


(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग २)

विष्णुपन्त कुलकर्णी (भाग १)

- अण्णा भाऊ साठे


कडूसं पडून तोंडओळख मोडली होती. अंधाराच्या लाटा गावाच्या डोकीवर नाचत होत्या. कभिन्न काळोखाने विष्णुपन्तांच्या वाड्याची उंची भुईसपाट केली होती. लूत भरलेल्या कुत्र्याप्रमाणे ओसाड वातावरण कण्हत होते. चोहोकडे नि:शब्दता नांदत होती.

विष्णुपन्त कुलकर्णांच्या वाड्यात विष्णुपन्त आणि मुरा बोलत उभे होते. देवळीत मंद जळणार्‍या निरांजनाचा थरथरता प्रकाश त्या दोघांवर खेळत होता.

विष्णुपन्तांच्या वयाने पन्नाशी मागे टाकली होती तरी त्यांचा धिप्पाड देह दणदणीत होता. त्यांच्या प्रचंड मस्तकावरचे टक्कल, रुंद गर्दन, टपोरे डोळे आणि पल्लेदार गालमिशा यांमुळे पंताना पाहताच ढाण्या वाघाची आठवण होत होती. आज ते गंभीरपणे बोलत होते.

मुरा खिन्न होऊन पंताकडे पाहत होता. त्याने आपले मजबूत हात पाठीमागे धरले होते. घोंगड्याची खोळ घेतली होती. घोंगड्याच्या दशा त्याच्या पीळदार पोटर्‍यांवर निर्जीव लोंबत होत्या. त्याचे तरुण, रसरसणारे डोळे पंतांवर स्थिरावले होते. त्यात चिंता भरली होती. त्याच्या नाकाचा शेंडा घामाने डबडबला होता. रुबाबदार चेहरा काळवंडला होता.

"आतापर्यंत किती माणसे दगावली?" पंतानी विचारले.

"ईस बारीकमोठी." मुरा पुटपुटला. त्याचे शब्द अंधारात चरफडत गेले.

"मग तुझं काय म्हणणं आहे?" पंतानी पुन्हा प्रश्न केला.

मुराने ओठांवरून जीभ फिरवली आणि तो शांतपणे म्हणाला, "भाकरी भाकरी करून पोरांचं चरफडून मरनं आणि त्यांचा हंबरडा आता माझ्याने ऐकवंना. ढेकळावानी काळीज ईरगाळतय माझं." त्याच्या पापणीला प्रकाशाचे कण लोंबकळू लागले. त्याने मान फिरवून आसू दडविण्याचा प्रयत्न केला.

"तसं नाही." पंत समजावणीच्या स्वरात म्हणाले, "धीराने घ्यायला पाहिजे मुरा."

"आबा," मुरा म्हणाला, "भोवळीचा अन् कुरडूचा पाला खाऊन जगतोय; पन जमंना. नुसती उपासमार असती तर पोट बांधून काळीज शाबुत ठिवलं असतं. पन ह्या साथीनं कडेलोट केलाय आमचा."

मुरा थांबला. त्याने पुढचे शब्द गिळून घेतले आणि पंतानी पुन: तोच प्रश्न उच्चारला.

"मग पुढं काय?" पंतांचा धीरगंभीर आवाज घुमला.

"तुमीच सांगा?" मुराने उलट प्रश्न केला.

"मी काय सांगू?" पंत बोलले, "गाव दुष्काळाच्या छायेत आहे हे मी सरकारात कळविलं आहे पण टीचभर चिठ्ठीने उत्तर नाही. मी केवळ मृतांची नोंद करणारा झालो आहे".

"मग आमास्नी धनी कोण?" मुरा वैतागून उद्गारला.

"कोण कुणाचा धनी नाही." पंत चटकन बोलू लागले, माझ्याही भोवती आक्रोश सुरू आहे, परन्तु माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जगलंच पाहिजे."

"पन आबा, कसं?" मुरा अधिकच चिडक्या स्वरात उद्गारला.

"जसं जमेल तसं" पंत त्याला पुढे बोलू न देता म्हणाले, काहिही करा परन्तु जगा." त्यांनी झेप घेऊन निरांजनातील वात सारून प्रकाश मोठा केला. प्रकाशाची पाचर अंधारात खोलवर गेली.


"मग आम्ही काय करावं?" मुराने विचारले. परन्तु पंतांचा चेहरा बिथरला. त्यांचा आवाज कडवट झाला.


"ते मला कळत नाही." पंत म्हणाले, "तुम्ही कुत्र्यासारखं मरू नका."


(क्रमश:)

Original post : विष्णुपन्त कुलकर्णी (भाग १)

अवेळीच केव्हा दाटला अंधार

कवी ना. धो. महानोर हे खरेतर निसर्गकवी पण त्यांच्या कविता केवळ प्रणयरम्य व शृंगाररस युक्त असतात म्हणून वाचणारे व ऐकणारे अनेकजण असतील. हा खरे तर त्यांच्यातील कवित्वाचा अपमान आहे. त्यांच्या कवितेतील शृंगाररसाला नाके मुरडणे जितके चूक तितकेच त्यांच्या कवितेतील केवळ शृंगाररसाचा आस्वाद घेणे अयोग्य होय.

श्रीधर फडक्यांची 'काही बोलायाचे आहे ही ध्वनिफित जेव्हा ऐकली तेव्हा मला ही कविता विशेष भावली. किंबहूना पुढे कित्येक दिवस ती माझ्या मनांत रेंगाळत राहिली. विशेषत: त्यातील दुसरे कडवे. त्यातील करुण रस, विरह यातना मनाला चटका लावून जातात. महानोरांच्या कवितांना ग्रामीण मराठीचा सुगंध आहे. अगदी थोड्या पण अचूक शब्दात ते कवितेचा आशय व्यक्त करतात आणि कविता वाचताना डोळ्यापुढे जणू शब्दचित्रच उभे राहते.

गावाबाहेरील एखादे निर्जन स्थळ, घरच्यांची करडी नजर चुकवून आपल्या प्रियकराला भेटायला जाणारी आपली नायिका - अभिसारिका, त्या नायिकेची वाट पाहत संकेतस्थळी एकाकी उभा असलेला तो प्रियकर आणि उशीरा का होईना पण दिलासादायक असे तिचे ते येणे.

एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले,
हासतांना नभ कलून गेलेले

अनेक दिवसांनंतर असा एकान्त मिळाल्याने मोहरून गेलेले ते प्रेमी युगुल एकमेकांकडे भावूकतेने निशब्दपणे पाहात राहतात. हृदयांत, मनांत आनंदाचे कारंजे फुलले आहे आणि यामध्येच बरांच काळ निघून जातो व दिवस कलतो.

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर,
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर

दिवस कलून रात्रीचा पहिला प्रहर चालू होतो. तो आणि ती दोघेही भानावर येतात. तो तिच्याकडे पुन्हा एकदा निरखून पाहतो आणि त्याला वाटते जणू आकाशातील चांदण्याच तिच्या तनुलतेला सजवित आहेत.

आणि माझा मला पडला विसर,
मिठीत थरके भरातील ज्वार

हे पाहून तो बेभान होतो आणि त्याचे विषयासक्त मन स्वत:ला आवर घालू शकत नाही आणि ते उत्कट प्रणयाच्या लाटेत वाहून जातात.

ते दोघे संपूर्ण रात्र तिथेच घालवितात. ती त्याला नंतर बरेच दिवस भेटत नाही. त्याला वाटते कि, तिच्या घरच्यांना झाल्या प्रकाराची कुणकुण लागल्याने तिला कोणा नातेवाईकाकडे पाठविले असावे.

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली,
तिच्या पोटी कुण्या राव्याची साऊली

आणि एक दिवस अचानक ती त्याला भेटते. मात्र यावेळी ती एकटी नसते तर तिच्या पोटी कुणाचा तरी वंश वाढत असतो.

तिच्या डोळीयांत जरा मी पाहिले,
काजळात चंद्र बुडून गेलेले

त्याची जरी तिच्यांत केवळ शारीरिक गुंतवणूक असली तरी तिचे स्त्रीमन त्याच्यात भावनिकदृष्ट्या पूर्णपणे गुंतलेले असते. ह्यावेळी जेव्हा तो तिच्या डोळ्यात पाहतो तेव्हा त्याला खोल कुठेतरी जाणवते की तिच्या डोळ्यातला तो मोद, ते हास्य घनतमात बुडून गेलेले आहे. ती त्या विरहाग्नीत होरपळून निघालेली आहे.

अवेळीच केव्हा दाटला अंधार,
तिला गळा जड झाले काळेसर....

मनाविरुद्ध झालेल्या अनपेक्षित लग्नामुळे तिच्या जीवनांत जो असमयी अघटित काळोख निर्माण झाला आहे तो शब्दात व्यक्त करणे खरोखरच कठिण होय यमक्या कवी आणि महानोर यांच्यातील फरक इथे जाणवतो. तिच्या संपूर्ण आयुष्याची तडफड त्यांनी अवघ्या २- ४ ओळीत अचूक मांडली आहे. फक्त कोमल, भावूक, तरल मनाच्याच व्यक्तीच ही कविता अनुभवू शकतात.

खरोखरच ना. धों. च्या अवघ्या १२ ओळी आणि श्रीधरजींचा आवाज कुठल्याही संवेदनशील, हळव्या मनाला अस्वस्थ करून सोडतात.

Original post : अवेळीच केव्हा दाटला अंधार