Saturday 17 August 2013

अश्वारूढ पुतळा

शिवाजी महाराजांचे असंख्य पुतळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही उभारण्यात आले आहेत, त्यामध्ये श्री. विनायक पांडुरंग करमरकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे स्थान अद्वितीय आहे. त्याविषयी त्यांनी लिहिलेला लेख ‘एका पुतळ्याची जन्मकथा’ हा कलावंताची वेदना आणि कलेच्या निर्मितिचा आनंद ह्यांचा पुरेपुर अनुभव देणारा आहे. सुरूवातीला त्यांनी ह्या अश्वारूढ पुतळ्याचा साडेतीन फूटाचे मॉडेल बनवले. हे मॉडेल करणे अतिशय कठीण असते कारण ते घोड्याच्या तीन नाजूक पायांवरच तोलले जाईल असे बनवावे लागते. शिवाय ते सर्व दृष्टिने परिपूर्ण असावे लागते. कारण त्यावरूनच मोठ्या आकारचे मातीचे मॉडेल तयार होते. पुतळ्याचा घोडा बनवण्यासाठी करमरकरांनी घोड्याचा अभ्यास केला. त्यासाठी स्टुडियोत राजाराममहाराजांचा ‘शाहनवाझ’ नावाचा अरबी घोडा आणून ठेवला. करमरकरांनी शिल्प घडवताना त्या घोड्याची गती, पाय उचलण्याची रीत, तोल सांभाळण्याची तऱ्हा, मानेचा डौल, शेपटीचा डौल इ. गोष्टींचा असा अभ्यास केला की अश्वतज्ज्ञांनीही त्या घोड्याच्या शिल्पाची तारीफ केली. त्यावेळी त्यांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणामुळेच आजही हा घोड्याचा पुतळा व त्यावरील शिवाजी महाराज आजही जिवंत वाटतात. छोटे मॉडेल तयार झाल्यावर मोठ्या पुतळ्याची ‘उंची साडेतेरा फूट, लांबी तेरा फूट आणि रूंदी साडेतीन फूट’ ठरवण्यात आली. त्यासाठी मातीचे मॉडेल बनवण्यासाठी चार टन माती आणण्यात आली आणि तीन टनाचा लाकडी सांगाडा तयार करण्यात आला. आता ह्या मातीच्या मॉडेल मध्ये सोळा टनाचा तापलेला कास्याचा रस टाकला जाणार होता. त्या साडेतेरा फूट उंचीच्या पुतळ्याचे एकसंध कास्टींग करण्याचे अशक्य वाटणारे काम करमरकरांनी केवळ स्वीकारलेच नाही तर यशस्वीही करून दाखवले. त्या काळात मॅकेनॉन व मॅकेन्झी कंपनीची माझगाव डॉक फाऊंड्री सर्वांत मोठी होती. त्याचा फोरमन रॉसमिसन हा गोरा साहेब होता. तो त्या मातीच्या पुतळ्याचे मॉडेल पाहून हबकला व म्हणाला, “पुतळा म्हणजे जिवंत कला आहे. ह्या पुतळ्याचे कास्टींग आमच्याच्याने होणार नाही. तुम्हाला त्यासाठी विलायतेलाच गेले पाहिजे”. त्यावर करमरकर आत्मविश्वासाने म्हणाले, “मी हे कास्टींग करू शकतो, इतकेच नव्हे तर एकसंध करू शकतो”. हे ऐकून तो गोरा साहेब काही क्षण करमरकरांकडे आश्चर्यचकित होऊन पाहात राहिला व नंतर त्यांचे दोन्ही हात हातांत घेऊन म्हणाला, “मित्रा तू धाडसी आहेस, मी आणि माझी माणसे तुला हवे ते करायला तयार आहोत. तू फक्त हुकूम कर”. १ जून, १९२८ च्या रात्री सोळा टन धातूचा रस बनवण्यात आला. करमरकर लिहितात, हा दिवस आणि ही रात्र माझ्या जीवनाचे भवितव्य ठरवणार होती. हे भवितव्य पाताळात गाडणार किंवा स्वर्गात नेणार अशा धारेवर मी उभा होतो. रॉसमिसन सुद्धा तणावाखालीच होता. प्रत्यक्ष तो तापलेला रस ओतण्याच्या वेळी तो सर्वांना ओरडून म्हणाला, “करमरकर रस ओता सांगतील व मी रिव्हॉल्व्हरने गोळी हवेत झाडून आवाज करीन. तो आवाज झाल्याबरोबर दोन्ही बाजूंनी रस ओतायला सुरूवात केली पाहिजे. सुरूवात एकाच क्षणाला झाली नाही किंवा रस ओतण्याची धार तुटली तर तुमच्यावर गोळ्या झाडेन व नंतर स्वतःवरही गोळी झाडून घेईन. माझ्याकडे सातबारी पिस्तुल आहे हे लक्षात ठेवा. फाऊंड्रीचे व करमरकरांचे नाव राखा किंवा मरून जा”. हे ऐकून सैनिकांप्रमाणे सर्व कामगार पुतळ्याच्या कामावर तुटून पडले व कास्टींग यशस्वी झाले. हे काम पाहण्यासाठी अनेक युरोपियन स्त्री-पुरूष, मुले तसेच माझगांव गोदीतील सर्व ऑफिसर्स, कर्मचारी जमले होते. क्रेनने जेव्हा तो पुतळा जमिनीवर ठेवला तेव्हा त्याचा धातू चकाकत होता. काही जण तर म्हणाले की घोडा श्वास टाकतो आहे आणि ते आम्हाला ऐकू येत आहेत. _____________________________________________________________________________________ गोऱ्या कातडीचे लांगूलचलन करण्याच्या वृत्ती अनुसार पुतळ्याच्या कामाच्या तपासणीसाठी जे. जे. स्कूलचे तत्कालीन डायरेक्टर कॅप्टन सॉलोमन ह्यांची निवड करण्यात आली. करमरकरांना ते पटले नाही. त्यांनी ह्या गोऱ्या साहेबाला केवळ एकदाच स्टुडियोत येऊ दिले आणि विचारले, “शिवाजी महाराजांचा इतिहास तू वाचून आला आहेस का”? साहेब ‘नाही’ म्हणाला. त्यावर करमरकर म्हणाले, “तू जर इतिहास वाचलेला नसशील तर तुला पॅनेल्स समजणार नाहीत”. हे ऐकून कॅप्टन सॉलोमन व त्याच्यासोबत आलेले चित्रकार धुरंधर हैराण झाले. करमरकरांनी लिहून ठेवले आहे, कलेची बाजू माझी मी पाहून घेण्यास समर्थ होतो. _____________________________________________________________________________________ सौजन्य - हा लेख नित्यनवा कलास्पर्श ह्या मासिकाच्या दिवाळी २०११ च्या अंकातून साभार घेण्यात आला आहे. ह्या लेखातील परिच्छेदांचे मूळ लेखक श्री. सुहास बहुळकर व श्री. विनायक पांडुरंग करमरकर आहेत.

No comments:

Post a Comment